Kolhapur News: प्रवासात सहा तास उपचार मिळणार कधी?, नातेवाईक दु:खाच्या सावटात
रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सीपीआरमध्ये पोहचण्यास तब्बल सहा तास लागले
By : इम्रान गवंडी
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्लेत रूग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती झाली. केवळ अपुऱ्या आरोग्य यंत्रणा वैद्यकीय सुविधेअभावी एका नवजात बालकाचा जन्मत:च मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. पावसामुळे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सीपीआरमध्ये पोहचण्यास तब्बल सहा तास लागले.
सकाळी 7 वाजता महिलेला कळा येत होत्या. ग्रामीण रूग्णालयात 9 वाजता गेल्यानंतर तेथे अपुऱ्या यंत्रणेमुळे सीपीआरला पाठवण्याचा सल्ला दिला. पण 11 वाजले तरी उपचारच मिळाले नाहीत. त्यातच रूग्णवाहिकेतच तिची प्रसुती झाली व पुढील अनर्थ घडला. पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. महिला सुखरूप वाचली असून तिच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
बालकाचा जीव वाचला असता
"सकाळी 9 वाजता आरोग्य केंद्रात नेले होते. तेथे कोणी डॉक्टर उपस्थित नव्हते, सातवा महिना लागला आहे. बाळाला काचेत ठेवावे लागणार असल्याने इथे व्यवस्था नाही, असे सांगितले. आमच्याकडून काही उपचार होणार नाही, तुम्ही सीपीआरला घेऊन जावा, असा सल्ला येथील कर्मचाऱ्यांनी दिला.
तेथून जात असताना रुग्णवाहिकेतच डिलिव्हरी झाली. बाळाला काखेत घेऊनच गाडीत बसलो होतो. सीपीआरमध्ये दुपारी साडेतीन वाजता दाखल झालो. सुरक्षारक्षकांनी रूग्णवाहिका आत घेतली नाही. तेथून चालतच यावे लागले. आम्हाला कमरेएवढ्या पाण्यातून चालत नेले. सोबत कोणीही डॉक्टर नव्हते. दरम्यान सहा तासाचा वेळ गेला, वेळेत पोचलो असतो तर डिलिव्हरी आणि बाळाचा जीवही वाचला असता."
- भागुबाई कोंडेकर, प्रस़ुती झालेल्या महिलेची आई
कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते
"ग्रामीण रूग्णालयात कोणतेही उपचार झाले नाहीत. एक तास प्रवास सुरू होता. गगनबावडा खोकुर्डीतील पुढे अर्धा तास पाण्यातून चालत नेले. त्यानंतर पेशंटला स्ट्रेचरवरून उचलून पाण्यातून घेऊन गेले. डॉक्टर कोणी उपस्थित नव्हते. केवळ बाहेर लोक उपस्थित होते. बाहेरच्या लोकांनी आम्हाला सीपीआरमध्ये आणले. दोन अप्शा सेविका गाडीमध्ये होत्या, त्या रंकाळा स्टॅंडवर उतरल्या.
शेवटपर्यंत आमच्या सोबत आल्या नाहीत. सीपीआर जवळ आल्यानंतरही आम्हाला आत प्रवेश दिला जात नव्हता. तेथून चालतच प्रसुती विभागात दाखल व्हावे लागले. सीपीआर मध्ये आल्यानंतरही काही वेळ महिलेवर उपचार करण्यास विलंब झाला. त्यानंतर मात्र डॉ क्टरांनी नियमित उपचार सुरू केले आहेत. पाणी आल्यामुळे एवढा मोठा गोंधळ झाला."
- लक्ष्मी कोंडीराम डुकरे, महिलेची नातेवाईक