शहरातील धोकादायक झाडांवर आरेखन
धोकादायक 400 झाडांचा सर्व्हे : 30 झाडांवर कुऱ्हाड, लवकरच कार्यवाही, वनखाते सक्रिय
बेळगाव : शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटविण्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवाय ही झाडे हटविण्यासाठी आरेखन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच धोकादायक झाडे हटविली जाणार आहेत. वादळी पावसात धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनखाते सक्रिय झाले आहे. शहरात धोकादायक जुनाट वृक्षांची संख्या मोठी आहे. अशी झाडे वादळी पावसात धोकादायक ठरू लागली आहेत. खासगी आणि शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. दरम्यान, धोकादायक वृक्ष हटवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन वनखात्याने वृक्ष तोडीच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. शहरातील विविध धोकादायक झाडे हटवावीत यासाठी दरमहा वनखात्याकडे 20 हून अधिक अर्ज दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, धोकादायक झाडांचा सर्व्हे करून त्या झाडांवर आरेखन केले जात आहे. आता तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
2022 मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी धोकादायक झाडे हटविण्यासाठी महापालिका आणि वनविभागाला आदेश दिला होता. या आदेशानुसार 8 ते 10 जणांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शहरातील धोकादायक 400 झाडांचा सर्व्हे केला होता. दरम्यान, त्यातील 30 टक्के झाडे तोडण्यात आली होती. एप्रिल महिन्यात धोकादायक झाडे हटवावीत यासाठी 55 अर्ज वनखात्याकडे आले आहेत. मनपा आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून 30 झाडांचा सर्व्हे केला आहे. ही झाडे हटविण्यासाठी मनपा आणि वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करून सूचना केल्या आहेत. लवकरच ही झाडे हटविली जाणार आहेत. वनखात्याकडे धोकादायक वृक्ष हटवावेत यासाठी दर महिन्याला शेकडो अर्ज दाखल होतात. मात्र, वनखात्याकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे अर्जांना केराची टोपली दाखविली जाते का? असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
झाडे 15 मेपर्यंत हटविली जाणार
नागरिकांनी त्यांच्या भागातील धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी केली आहे. त्यानुसार 30 धोकादायक झाडांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. शिवाय त्या झाडांवर आरेखनही करण्यात आले आहे. मनपाकडून परवाना (एनओसी) घेतल्यानंतर ही झाडे 15 मेपर्यंत हटविली जाणार आहेत.
- पुरुषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)