सदाशिवनगर परिसरात नालेसफाई
बेळगाव : वळीव पावसाने नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नाले, गटारी आणि ड्रेनेजची वेळेत सफाई होत नसल्याने पाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: गटारीत कचरा साचून दुर्गंधीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटारी, नाले आणि ड्रेनेजची स्वच्छता करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत असते. मात्र, मनपाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील वळीव पावसातच नाले, गटारी आणि ड्रेनेजच्या स्वच्छतेचा प्रश्न समोर येत आहे. सदाशिवनगर येथील शेवटचा क्रॉस येथे नाल्याची सफाई न झाल्याने दुर्गंधी पसरली होती. नाल्यात कचरा आणि प्लास्टिक साचून राहिल्याने पाण्याचा निचरा थांबला होता. दरम्यान, नागरिकांनी मनपा आयुक्तांना स्वच्छतेसाठी विनंती केली होती. याची दखल घेत मनपाने सदाशिवनगर परिसरातील नाल्यांची स्वच्छता केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मनपाने शहरातील लेंडी नाला आणि इतर लहानसहान नाले आणि गटारींची वेळेत स्वच्छता करावी. अन्यथा पावसाळ्यात शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. सदाशिवनगर परिसरात पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. काही घरांभोवती तलावाचे स्वरुप येत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अशक्य होऊ लागले आहे. यासाठी आताच नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे.