प्रशासनाच्या दिरंगाईनेच मोर्लेतील शेतकऱ्याचा बळी घेतला : डॉ जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
दोडामार्ग - मोर्ले येथील लक्ष्मण गवस या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला . ही घटना अतिशय दुर्दैवी असून शासनाने हत्ती पकड मोहिम तात्काळ राबवून भयभीत झालेल्या शेतकरी बांधवांना भयमुक्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर व संदीप सावंत यांनी केली आहे . यावेळी सरकारच्या दिरंगाईच्या धोरणावर देखील त्यांनी टीकास्त्र डागले आहे. डॉ .परुळेकर म्हणाले, सरकारच्या हलगर्जीपणा आणि दिरंगाईमुळे काल एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला ही प्रशासनाची शेतकऱ्यांना क्रूर शिक्षा आहे का असा देखील सवाल त्यांनी विचारलाय . दोडामार्ग तालुक्यात हत्ती शिरल्याचे ग्रामस्थांनी वनखात्याला वारंवार कळवले होते . परंतु , वनखात्याने तात्काळ पाऊले उचलली असती तर कालची दुर्दैवी घटना घडलीच नसती. त्यामुळे सरकार , वनखात्याला अजून किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत?तंत्रज्ञान एवढं प्रगत असताना आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात हत्ती पकड मोहीम यशस्वीपणे राबवली जात असताना मोर्लेत अशी घटना घडतेच कशी हा देखील सवाल आहे . ड्रोनच्या सहाय्याने हत्तींचे लोकेशन शोधणे आता फार कठीण नाही.खरेतर प्रशिक्षित हत्तींना जिल्ह्यात एव्हाना आणले गेले पाहिजे होते. पण प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती दुर्बल असून सगळा कागदी घोडे नाचवण्याचा खेळ दिसत आहे असा आरोप देखील परुळेकर यांनी केलाय . गवेरेडे,हत्ती या रानटी प्राण्यांची मोठीच दहशत सध्या दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. पुढील काळात किती आणि कोणाकोणाचे मृत्यू होतील हे आज सांगणं कठीण आहे.तसेच घरातला कर्ता पुरुष गेला आणि मोजकी पंचवीस लाखांची भरपाई? हा एक क्रूर विनोद असून कमीतकमी एक कोटी रुपयांची सन्मानजनक मदत सरकारने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना दिलीच पाहिजे,मृत व्यक्तीच्या मुलाला सरकारी नोकरी दिलीच पाहिजे अशी मागणी देखील श्री परुळेकर यांनी केलीय .