युद्ध झाल्यास पाकिस्तानला साथ देऊ नका
पाकिस्तानी इमामाचे पाकिस्तानी मुस्लिमांना आवाहन
पाकिस्तानातील एका प्रभावशाली इमामाने भारतासोबतच्या संभाव्य युद्धावरून मुस्लिमांना खास आवाहन केले आहे. या इमामांनी मुस्लीम समुदायाला पाकिस्तानची साथ न देण्याचे आवाहन केले आहे. याच्याशी निगडित एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्लामाबादच्या लाल मशिदीचे इमाम अब्दुल अजीज गाजी यांनी कुठल्याही अन्य देशापेक्षा पाकिस्तानात मुस्लिमांवर अधिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. भारताने कधीच लाल मशीद किंवा वजीरिस्तानवर बॉम्ब टाकले नाहीत. परंतु पाकिस्तानी सैन्य स्वत:च्या लोकांवरच हल्ले करत असते, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास ते निश्चितपणे धर्मयुद्ध नसणार आहे. पाकिस्तानचे युद्ध समुदायाचे युद्ध आहे. पाकिस्तानात सध्या भारतापेक्षा अधिक क्रूरता आणि बिकट स्थिती आहे. पाकिस्तानात सैन्याकडून मुस्लामांवर जितके अत्याचार केले जातात, तितकी क्रूरता भारतात निश्चितच नाही. पाकिस्तान सरकार स्वत:च्या लोकांवरच विध्वंसक बॉम्ब टाकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात ज्याप्रकारे लोक गायब होतात, तसेच भारतात गायब होतात का? पश्तून, बलोच, पीटीआय कार्यकर्ते, मौलवी आणि पत्रकार गायब होण्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे वक्तव्य इमामांनी केले आहे.