सायबर भामट्यांच्या फोन कॉल्सना बळी पडू नका
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पालकांना आवाहन
पणजी : मुलांचे अपहरण केल्याचे कॉल्स आल्यास आधी पोलिसांशी संपर्क साधा, सायबर भामट्यांच्या फोन कॉल्सना बळी पडू नका, तसेच त्यांच्या मागणीनुसार पैसे पाठवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले. शून्य प्रहराला उपस्थित करण्यात आलेल्या या विषयावर ते बोलत होते. आमदार संकल्प आमोणकर यांनी सदर विषय मांडला होता. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुह्यांची संख्या वाढत आहे. मुलाचे अपहरण केल्याचे फोन करून पालकांकडून पैसे उकळले जात आहेत. अनेक पालक त्याला बळीही पडले आहेत. यावर सरकारने योग्य ती कृती करावी, अशी मागणी आमोणकर यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, अशा घटनांमागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे सांगितले. ही टोळी विदेशातून कार्यरत आहे. सायबर गुन्हे विभागाने त्यांचा शोध सुऊ केला आहे. परंतु पालकांनी अशाप्रकारचे फोन आल्यास घाबरून जाऊ नये. तसेच तत्काळ पैसेही पाठवू नयेत. त्याआधी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.