भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका
काँग्रेसच्या प्रचारावेळी आय. आर. घाडी यांचे आवाहन
खानापूर : गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाला समृद्ध बनवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक गोरगरिबांच्या हाताला काम देण्याचे काम तसेच जमीन कसणाऱ्यांना जमिनी मिळवून देण्याचे काम करून देशात मोठी क्रांती घडविली आहे. केवळ दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाला समृद्ध बनवण्याचा सुरू केलेला कांगावा हा केवळ बनाव आहे. सध्या मोदी पॅटर्न म्हणजेच मुस्लीम विरोधा व्यतिरिक्त दुसरा कोणताच मुद्दा भाजप पक्षाकडे नाही. गेल्या दहा वर्षात ज्या योजना जाहीर केल्या त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या काय, याचे स्पष्टीकरण भाजप देऊ शकत नाही. काँग्रेसने देश उभारणीचे काम केलेले आहे. आणि देशातील सामान्य जनतेला दिलेला शब्द पाळण्याचे काम काँग्रेसने केलेले आहे. यासाठी भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना खानापूर तालुक्यातून मताधिक्य द्यावे, असे आवाहन खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांनी काटगाळी येथील काँग्रेस प्रचार सभेत केले.
यावेळी महादेव घाडी म्हणाले, काँग्रेस पक्ष हा समाजाला तारणारा पक्ष आहे. या पक्षाने देशाला समृद्ध बनवण्यासाठी सत्तर वर्षे घालवली. स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधींसारख्या महान नेतृत्वाने देशासाठी आपले बलिदान दिले.. कसणाऱ्यांना जमिनीसह आणि एक चांगले पॅटर्न आतापर्यंत देशात राबवले आहेत. कर्नाटक सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे गॅरंटी योजना अंतर्गत अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. त्यातच अंजली निंबाळकरसारख्या एक उच्च शिक्षित महिला आज लोकसभेच्या उमेदवार म्हणून आपल्याला उत्तर लोकसभा मतदारसंघात लाभलेल्या आहेत. उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसला वाढता पाठिंबा असल्याकारणाने त्यांचा विजय निश्चित आहे. खानापूर तालुक्यामध्ये माजी आमदार म्हणून काम करताना विकास साधलेला आहे. त्यांनी खानापूर ही आपली कर्मभूमी म्हणून खानापूर तालुक्यात काम करत आहेत. यासाठी हक्काने आपल्या माणसाजवळ उद्या दाद मागण्यासाठी जवळचा खासदार होणे गरजेचे आहे. अंजली निंबाळकर या तालुक्याच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करणार यात शंका नाही. यासाठी तमाम जनतेने काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना भरघोस मतानी निवडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी महिला ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता दंडगल, नारायण सावंत, कृष्णा मन्नोळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.