विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; संचालक मंडळाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांना विनाकपात प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय
शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यास सन २०२४-२५ मध्ये गळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विनाकपात प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
ते म्हणाले, पूर्वी एकरकमी प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत. आता ५० रुपये देणार असून एकूण दर ३ हजार २७५ रुपये प्रतिटन झाला आहे. 'विश्वास'च्या संचालक मंडळाने काल (ता. ९) कामगारांना १२ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्याबरोबर आज प्रतिटन ५० रुपये जाहीर करून कामगारांबरोबर मानसिंगराव नाईक बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांची ही दिवाळी गोड होणार आहे.
सन २०२४-२५ हंगामात साडेपाच हजार टन प्रतिदिनी प्रमाणे ४ लाख, ४३ हजार १६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून ५ लाख ३२ हजार ७३० साखर पोती उत्पादन झाले होते. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी सातत्याने विश्वास कारखान्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहे.
सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत विश्वासने दमदार वाटचाल केली आहे. अध्यक्ष नाईक यांनी सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्त ऊस दराची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्यात १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे.
ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमता (ए.आय.) तंत्रज्ञान अनुदान, पतीवर खते व औषधे, एक रुपयात उसाचे बियाणे, माफक दरात कंपोस्ट व कारखाना बनवत असलेली द्रवरूप जिवाणू खते शेतकऱ्यांना दिली जात आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, या हेतूने आजवर कारखान्याने वाटचाल केली आहे.
नाईक म्हणाले, साखर कारखानदारीपुढे अनेक अडचणी आहेत. असमतोल पावसामुळे गेल्या काही वर्षात उसासह सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा लागत आहे. साखरेच्या अस्थिर किमती, मागणीत घट, केंद्र सरकारचे निर्यात धोरण व केंद्राने उसाच्या खरेदी दरात केलेली वाढ व साखरेच्या विक्री दरात वाढ न केल्याने एकूण साखर व्यवसायापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तरीही विश्वास कारखान्यावर ऊस उत्पादकांनी विश्वास कायम ठेवला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊस पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.