नसलेल्या घराला क्रमांक देऊन 21 वेळा विभाजन!
घरपट्टी, दुऊस्तीसाठी ना हरकत दाखलाही देण्याचे प्रकार : जुने गोवे परिसरात जमिनीचा महाघोटाळा उघडकीस
पणजी : मुळात घर अस्तित्वात नाही. त्यात त्याला क्रमांक दिला व पुढे जाऊन त्याचे विभाजनही केले. त्याही पुढे जाताना हे विभाजन एकेक करत तब्बल 21 क्रमांकापर्यंत नेले, आणि भ्रष्टाचाराची परिसीमा म्हणजे अस्तित्वात नसलेल्या घरांच्या नावे घरपट्टीही भरून घेण्यात आली. वेळोवेळी त्यांना दुऊस्तीसाठी ना हरकत दाखलेही देण्यात आले आहे. असा अजब प्रकार गोव्याच्या इतिहासात बहुधा प्रथमच घडला असून त्याचे श्रेय जुने गोवे पंचायतीला जात आहे, अशी टीका मारिओ फेर्रांव आणि जॉन मास्कारेन्हस यांच्या मंचने केली आहे. काल बुधवारी पणजीत साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्वीस गोम्स यांचीही उपस्थिती होती. या प्रकारास त्यांनी ‘भूत बांधकामे’ असे नाव दिले असून सर्वसामान्य गोमंतकीयांसह बड्या अधिकाऱ्यांनाही चूना लावण्यात माहीर असलेल्या वर्मा, शर्मा, कुट्टी, शेट्टी, यासारख्या दिल्ली, हरियाणा, आदी राज्यातून आलेल्या नवगोमंतकीयांपैकी एका व्यक्तीने हा उद्योग केला आणि स्थानिक स्वराज संस्थेसह बड्या अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभले असल्याचे कागदपत्रांसह फेर्रांव यांनी उघडकीस आणले आहे.
वर्ष 2005 पासून चालतोय प्रकार
वर्ष 2005 पासून बिनदिक्कतपणे चाललेल्या या प्रकारास जबाबदार असलेल्या सर्व संबंधित पंचायत अधिकारी, सचिव आणि आपल्या तक्रारींना दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांना दोषी धरून कठोर कारवाई करावी असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केले आहे.
जमिनी हडप करणे हाच हेतू : गोम्स
जुने गोवे परिसराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली असल्याने त्याचे रक्षण करणे हे केंद्रासह राज्य सरकार, स्थानिक पंचायत तसेच नगरनियोजन खाते आणि अन्य सर्व संबंधितांचे कर्तव्य आहे. परंतु आजपर्यंत ते होत नाही. कारण प्रत्येकाला असे घोटाळे करून सभोवतालच्या जमिनी हडप करायच्या आहेत. त्यासाठी प्रसंगी या स्थळाचा वारसा दर्जा गमावला तरी चालेल परंतु स्वहित साध्य झालेच पाहिजे, ही वृत्ती त्यामागे दिसून येत आहे, असे गोम्स म्हणाले. अशा या वारसा स्थळात अशी बेकायदा कृत्ये घडत असून अस्तित्वात नसलेल्या घरांना क्रमांक देऊन तब्बल 21 वेळा त्याचे विभाजन करणे व त्याही पुढे जाऊन या घराला दुऊस्तीसाठी परवानाही देण्यात येणे हा प्रकारच पचनी न पडणारा आहे, असे मत एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केले. असे चमत्कार केवळ भाजप सरकारातच घडू शकतात आणि त्यांनी ते कऊनही दाखवले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या प्रकरणी मंचतर्फे मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप कुणीही या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यावरून हा एक महाघोटाळा असून त्यात प्रत्येकजण गुंतले असल्याचे सिद्ध होत आहे, असे गोम्स म्हणाले. गटविकास अधिकारी, तत्कालीन पंचायत सचिव, या घरांना क्रमांक मिळवून घेणारा हरियाणातील अर्जदार, यांच्यासह ज्या ज्या यंत्रणेने तक्रार दाखल होऊनही दुर्लक्ष केले त्या सर्वांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गोम्स यांनी केली आहे.