खरिपात 34 हजार क्विंटल बियाणांचे वितरण
10 हजार बियाणांचा साठा शिल्लक : पुरेशा पावसामुळे बियाणांची लवकर उचल
बेळगाव : यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 34,359 क्विंटल बी-बियाणांचे वितरण झाले आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा वेळेत बियाणांची उचल झाली आहे. जिल्ह्यातील रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघ आणि तात्पुरत्या केंद्रातून या बियाणांचे वितरण करण्यात आले आहे. शिवाय अद्यापही 10,404 क्विंटल बियाणांचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.
जिल्ह्यात यंदा 7.40 लाख हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. विशेषत: भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, कापूस, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी आणि लागवड झाली आहे. यंदा पावसाला वेळेत प्रारंभ झाल्याने पेरणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बियाणांची उचलही वेळेत पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात कुठेही बियाणांचा तुटवडा निर्माण झाला नाही. शिवाय पुरेसा बियाणांचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही कृषीने दिली आहे.
खरीप हंगामात ऊस, भात, सोयाबीन आणि भुईमूगचे क्षेत्र अधिक आहे. यंदा जिल्ह्यात जून महिन्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. त्याबरोबर जुलैमध्येही पुरेसा पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पेरणी आणि लागवडीची कामेही पूर्ण होत आहेत. गतवर्षी पावसाअभावी बियाणांचा साठा रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएसमध्ये पडून होता. निम्म्याहून अधिक साठा जाग्यावर होता. मात्र, यंदा समाधानकारक पावसामुळे वेळेत पेरणी झाली आहे.
10,404 क्विंटल बियाणे अद्याप शिल्लक
यंदा वेळेत पावसामुळे बियाणे, खते आणि किटकनाशके यांची उचल झाली आहे. पेरणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शिवाय अद्यापही खात्याकडे 10,404 क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. कुठेही बियाणांचा तुटवडा निर्माण झाला नाही.
- शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)