भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजी संघांकडून निराशा
वृत्तसंस्था/शांघाय, चीन
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्टेज 2 तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला रिकर्व्ह संघांना पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. पुरुष संघाला चौथे स्थान मिळाले तर महिला संघाचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. धीरज बोम्मदेवरा, अतानू दास, तरुणदीप राय या सातव्या मानांकित संघाला कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकन संघाकडून 3-5 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पहिला सेट त्यांना 56-57 असा थोडक्यात गमवावा लागला. 8 च्या रिंगमध्ये तीर बसल्याने त्याचा फटका भारताला बसला. ख्रिश्चन स्टॉडार्ड, ब्रॅडी एलिसन, जॅक विल्यम्स या अमेरिकन त्रिकुटाने दुसरा सेट 56-52 असा घेतल्यानंतर 4-0 अशी आघाडी घेतली.
दबावाखाली भारतीय संघ गडबडल्याने दोन 7 च्या रिंगमध्ये तीर मारला. याशिवाय दोन 9 व दोन 10 च्या रिंगमध्ये तीर मारले. 0-4 असे पिछाडीवर पडल्यानंतर भारताने झुंजार खेळ करीत तिसऱ्या सेटमध्ये अमेरिकन संघाला 55-54 असे नमविले. चौथ्या सेटमध्ये 56-56 असे टाय झाल्यानंतर शूटऑफमध्ये लढत नेण्याच्या भारताच्या आशा मावळल्या. यावेळी आणखी एक तीर 8 च्या वर्तुळात लागला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत चुरशीच्या लढतीत भारतीय पुरुष संघाला फ्रान्सकडून 4-5 (25-26) असा पराभव स्वीकारावा लागला. महिला विभागात दीपिका कुमारी, अंकिता भगत, अंशिका कुमारी यांनी पात्रता फेरीत चांगले प्रदर्शन केले होते. पण उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांना 14 व्या मानांकित मेक्सिकोकडून 4-5 (26-27) असा शूटऑफमध्ये पराभवाचा धक्का बसला.