भारत-पाकिस्तान तणावादरम्यान राजनैतिक घडामोडींनाही गती
इराणचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत दाखल : सौदी अरेबियाचे मंत्रीही अचानक दिल्लीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. जगभरातील देश शांततेचे आवाहन करत आहेत. याचदरम्यान, सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल अलजुबैर अचानक दिल्लीत पोहोचले आहेत. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांच्या या भेटीकडे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांव्यतिरिक्त इराणचे परराष्ट्रमंत्री देखील भारत दौऱ्यावर आले आहेत. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत भारत-पाकिस्तान यांच्यातील सद्यस्थितीची चर्चा झाल्याचेही समजते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘आज सकाळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल अलजुबैर यांच्याशी चांगली भेट झाली. दहशतवादाशी दृढपणे लढा देण्याबाबत भारताचा दृष्टिकोन सामायिक केला’ असे स्पष्ट केले.
इराणचे मंत्रीही भारतात दाखल
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची बुधवारी मध्यरात्री नवी दिल्लीत पोहोचले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. तसेच दुपारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अरघची नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या भेटीमुळे भारत आणि इराणमधील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतात येण्याच्या काही दिवस आधी अरघची यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. ऑगस्ट 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर इराणी परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आपल्या भेटीदरम्यान अरघची 20 व्या भारत-इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील आणि हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमधील चर्चेत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.