सीमाभागातील दिंड्यांनाही मिळावी आर्थिक मदत
महाराष्ट्र शासनातर्फे दिंड्यांना निधी मंजूर : बेळगाव परिसरातील वारकऱ्यांतून अपेक्षा
बेळगाव : पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी दिंड्यांना आता प्रत्येकी 20 हजारांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे बेळगाव सीमाभागातून दरवर्षी जाणाऱ्या दिंड्यांनादेखील ही आर्थिक मदत लागू करावी, अशी मागणी सीमाभागातील वारकरी मंडळ, दिंडी चालक आणि विठ्ठल भक्तांतून होत आहे.बेळगाव परिसरातून दरवर्षी आषाढी वारीसाठी 20 ते 25 दिंड्या मार्गस्त होतात. विशेषत: यातील काही दिंड्यांनी 30 वर्षांपासून आपली परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे या दिंड्यांनाही महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेने 2018 पासून केलेल्या मागणीला यंदा यश आले आहे.
यासाठी 18 कोटींचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे. विठुरायांच्या दर्शनाची आस लागून राहिलेले वारकरी उन, पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता दिंडीमध्ये सहभागी होतात. त्यामध्ये काही नागरिक स्वइच्छेने अन्न, धान्य, शिधा, पंगती देऊन मदत करतात. त्याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या आषाढीपासून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव सीमाभागातून यंदाही पायी दिंड्यांचे प्रस्थान सुरू झाले आहेत. यामध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. वारकऱ्यांनी आपली परंपरा कायम ठेवत दिंडी सुरू ठेवली आहे. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील दिंड्यांनाही आर्थिक मदत लागू करावी, अशी मागणी वारकऱ्यांतून करण्यात येत आहे.
वारकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्या
महाराष्ट्र सरकारने दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याप्रमाणे सीमाभागातून जाणाऱ्या दिंड्यांनाही आर्थिक मदत लागू करावी. बेळगावातून पायीदिंड्या प्रस्थान करू लागल्या आहेत. आषाढी एकादशीपूर्वी सीमाभागातील दिंड्यांनाही मदत देण्यात यावी आणि वारकऱ्यांना दिलासा द्यावा.
- हभप शंकर बाबली (बेळगाव जिल्हा वारकरी भाविक सेवा संघ)