चोवीस तास पाण्यासाठी काँक्रीट रस्त्यांची खोदाई
रस्त्यांची लागली वाट : एलअॅण्डटीकडून काम : स्थानिक नागरिकांचे हाल
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील बहुचर्चित असलेल्या 24 तास पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी खोदाई केली जात आहे. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावरच घाव घातला जात आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठ्यासाठी रस्त्याची वाट लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
एलअॅण्डटी कंपनीकडून शहरातील 58 प्रभागापैकी 7 प्रभागामध्ये 24 तास पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याबरोबर इतर ठिकाणीही 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी रस्त्याची खोदाई केली जात आहे. त्यामुळे रस्ते आणि पेव्हर्स उखडले जात आहेत. विशेषत: खोदाई झाल्यानंतर तातडीने काम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र, खोदाई झाल्यानंतर जलवाहिन्या घालून चरी बुजविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करणेही अडचणीचे ठरू लागले आहे.
एलअॅण्डटीकडून काम संथगतीने
शहरातील अनगोळ, भाग्यनगर येथील काही प्रभागामध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. इतर आवश्यक ठिकाणीही 24 तास पाण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. यासाठी रस्त्यांवर चर काढण्याचे काम सुरू आहे. भोई गल्ली, विजयनगर, रक्षक कॉलनी, पाईपलाईन रोड आदी ठिकाणी रस्त्यावर चरी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे. विशेषत: एलअॅण्डटीकडून हे काम अधिक संथगतीने होत असल्याने स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे. खोदलेल्या चरींमध्ये तातडीने जलवाहिन्या घालून बुजवाव्यात, अशी मागणीही होत आहे.
24 तास ऐवजी सुरळीत पाणीपुरवठा करा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर दुसरीकडे 24 तास पाणीपुरवठ्यासाठी चरी खोदण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरही पाण्यासाठी नागरिकांची हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांतून आम्हाला 24 तास पाणी पुरवठ्याऐवजी सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
ढिसाळ नियोजन
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात काँक्रिटचे रस्ते होण्यापूर्वीच जलवाहिन्या घातल्या असत्या तर आज सुस्थितीत असलेले रस्ते उखडून टाकण्याची वेळ आली नसती. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्मार्ट काँक्रीट रस्त्यांची वाट लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा चुराडाही होऊ लागला आहे. खोदलेले रस्ते पुन्हा तयार करावे लागणार आहेत. त्यामुळे निधीचाही अपव्यय होणार आहे.