Health Department : जलजन्य आजार टाळण्यासाठी रत्नागिरीत अतिसार नियंत्रण मोहीम
आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा मोहीम राबविली जाणार आहे.
रत्नागिरी : जलजन्य आजार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत जिह्यात 1 जून ते 31 जुलै दरम्यान ग्रामपंचायत विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, महिला बालविकास विभाग यांच्या समन्वयाने आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा (स्टोप डायरिया) मोहीम राबविली जाणार आहे.
जलजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी केले आहे. नवजात अर्भक तसेच 5 वर्षा आतील एकूण बालमृत्यूपैकी 5 ते 7 टक्के मृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी 5 वर्षाच्या आतील बालकांचे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करून अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस क्षारसंजीवनी प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिह्यात ग्रामपंचायत विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, महिला बालविकास विभाग यांच्या समन्वयाने आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा (स्टोप डायरिया) मोहीम राबविली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतीच रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती सभेमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिऊद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे तसेच आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जलजन्य आजार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे टीसीएलद्वारे पाणी शुद्धीकरण करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, पुरेसा टीसीएल पावडरसाठा तसेच तो योग्य हवाबंद स्थितीत ठेवणे, नियमित ओटी टेस्ट घेणे या सर्व बाबींचे पर्यवेक्षण करून काळजी घेणे बाबतच्या सर्व सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिऊद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी अतिसार थांबवा मोहीमेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.