For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोंडगणांनी शिस्तीचे पालन करावे

12:47 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
धोंडगणांनी शिस्तीचे पालन करावे
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचे आवाहन : मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन,राज्यपालही पोहोचले मृतांच्या घरी

Advertisement

डिचोली : शिरगावातील जत्रोत्सवात झालेल्या दुर्दैवी घटनेतून प्रशासनाने कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याची जाणीव ठेऊन त्या गोष्टी सुरळीत करण्यात येणार आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची दक्षता घेत प्रशासनकडून खबरदारी घेतली जाणार आहे. प्रशासन आपली कामगिरी बजावणार आहे, पण धोंडगणांनीही जत्रोत्सवात सहभागी होताना शिस्तीचे पालन करायला हवे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. चेंगराचेंगरीत निधन झालेल्या पडोसे येथील सूर्या नयेकर यांच्या घरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नयेकर कुटुंबाबरोबर व सूर्या नयेकर यांच्याबरोबर जत्रोत्सवात सहभागी झालेल्या धोंडगणांशी चर्चा केली व संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनीही काल रविवारी मृत व्यक्तींच्या निवासस्थानी म्हणजे माडेल-थिवी येथे भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला आणि त्यांचे सांत्वन केले.

पोलिसांची उलटी उत्तरे

Advertisement

या जखमी धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना चेंगराचेंगरीवेळी घडलेली संपूर्ण घटना कथन केली. चेंगराचेंगरी झाली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हवी तशी प्रथमदर्शनी मदत केली नाही. उलट आम्हालाच उलट उत्तरे देण्यात आली. आम्हीच आमच्या माणसांना घेऊन उपचारासाठी धावत सुटलो. पोलिसांची गाडीही सुरू होत नव्हती. नंतर अधिकारीवर्ग घटनास्थळी धावून आल्यानंतर ड्युटीवरील पोलिसांनी मदतीचा हात दिला, असे या धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

बारा दिवसांनंतर आर्थिक सहाय्य

मयतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे प्रत्येकी 10 लाख ऊपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या मृत व्यक्तींना बारा दिवस झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सदर आर्थिक मदत सुपूर्द केली जाईल. एकंदरीत या घटनेमुळे जीव गेलेल्या सर्वांप्रती आपण संवेदनशील असून सरकारतर्फे सर्व जखमींना पूर्ण सहकार्य पुरविले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

चौकशी अहवाल आज मिळणार

या जत्रोत्सवात घडलेल्या दुर्दैवी प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी संदीप जॅकीस यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून जत्रोत्सवात घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी व अभ्यास सुरू आहे. त्याचा अहवाल सरकारला आज सोमवार दि. 5 मे रोजी मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.