धर्मवीर बलिदान मासची गांभीर्याने सांगता
हजारो धारकऱ्यांचा सहभाग
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. सोमवारी धर्मवीर बलिदान मासची सांगता झाली. छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा मूकफेरीद्वारे काढून ज्वाला शांत करण्यात आली. फाल्गुन अमावास्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 335 व्या पुण्यतिथीनिमित्त शिवप्रतिष्ठानच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. फंदफितुरी करून धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबने नरक यातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्राही निघू शकली नव्हती. हे बलिदान हिंदू समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी सोमवारी मूक पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे व जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते ज्वालेच्या मूक पदयात्रेला सुरुवात झाली. एसपीएम रोड, शनि मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्लीमार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे मूक पदयात्रेची सांगता झाली. संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. छत्रे गुरुजी, रवी जोशी यांनी मंत्राग्नी दिला. किरण गावडे, हिरामणी मुचंडीकर यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावर्षी तब्बल 145 विभागात ज्वाला देण्यात आली. सिंधुदुर्ग, डिचोली, दोडामार्ग, गोकाक, चंदगड, रायबाग या भागात ज्वाला वितरित करण्यात आली. मूक पदयात्रेला हजारोंच्या संख्येने धारकरी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अमोल केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, गजानन निलजकर यासह धारकरी उपस्थित होते.