Dhamani Prakalp: 'धामणी'चे रौप्यमहोत्सवी वर्ष 40 गावांसाठी फलदायी कसे ठरेल?
सुरुवातीस 60 टक्के मातीचा भराव झाला अन् काम बंद पडले
गगनबावडा : धामणी धरणात यंदा पावसाळ्याचे पाणी अडवले. सव्वा टी एमसी पाणीसाठा होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. हे वर्ष धुंदवडे आणि धामणी खोऱ्यातील 40 गावांतील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरले आहे. माजी मंत्री विनय कोरे यांनी पायाभरणी केलेल्या राई येथील धामणी प्रकल्पाचा कळस पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी चढवल्याचा आनंद येथील जनतेला होत आहे.
गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील 40 गावांतील जनतेचा पाणी प्रश्न मार्गी लावणाऱ्या राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाचा पाया शनिवार 16 डिसेंबर 2000 रोजी तत्कालीन पन्हाळा-बावड्याचे आमदार विनय कोरे यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, पाटबंधारेमंत्री अजित घोरपडे यांच्या उपस्थितीत झाला होता.
सुरुवातीस 60 टक्के मातीचा भराव झाला अन् काम बंद पडले. त्यानंतर विविध कारणांनी प्रकल्प तब्बल 24 वर्षे रखडला. 120 कोटीचे धरण 900 कोटींवर गेले. रखडलेल्या धामणी प्रकल्पाचे काम पूर्ववत सुरु व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.
2019 घ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी महायुतीच्या काळात धरणाच्या कामास गती मिळण्यासाठी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते घळभरणी करुन जनतेला दिलासा दिला होता.
धरण कृती समिती आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाठपुरावा केला. या पावसाळ्dयात दीड टीएमसी पाणीसाठा होईल, असे आश्वासन दिले. हे खरे ठरले. 3-4 दिवसांपासून धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे रौप्य महोत्सवी वर्ष 40 गावांतील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरले आहे, एवढे मात्र निश्चित.
ओलिताखाली येणार 2500 हेक्टर क्षेत्र
धरणामुळे गगनबावडा-890 हेक्टर, पन्हाळा-910 हेक्टर तर राधानगरी-700 हेक्टर असे 3 तालुक्यांतील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणाची लांबी 1265 मीटर तर उंची 75 मीटर होणार आहे.
प्रकल्प पाहण्यासाठी गर्दी
प्रकल्पात पावसाळा सुरु झाल्यापासून पाणी अडवले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. हे पाहण्यासाठी सुळे, पणोरे, हरपवडेसह धामणी खोऱ्यातील शेतकरी येत आहेत.