भक्तलक्षणे 1
अध्याय नववा
सर्व सृष्टीक्रम व प्रत्येकाचा जीवनक्रम कसा चालवायचा हे नियतीनं आधीच ठरवून ठेवलेले असते. मी असं करीन, मी तसं करीन असे माणसाने मनात कितीही मांडे खाल्ले तरी ईश्वराच्या मनात असेल तेच घडतं याचा प्रत्यय माणसाला वारंवार येत असतो. तो तसा येऊ लागला की, ध्यानीमनी नसलेल्या अनेक चांगल्या वाईट घटना घडतात आणि मनुष्य त्याकडे अचंबित होऊन पाहू लागतो. जेव्हा सर्व काही ईश्वराच्या हातात आहे हे लक्षात येतं तेव्हा तो प्रेरणा देईल त्याप्रमाणे कार्य करत जाणे एव्हढंच माणसाच्या हातात उरतं. म्हणजेच ईश्वर त्याच्या मर्जीनुसार आणि त्याला वाटेल तेव्हढंच कार्य माणसाकडून करून घेत असतो. हे ज्याला पूर्णपणे ऊमजलंय, पटलंय त्याच्या हातून कर्मफळाचा त्याग सहजगत्या होतो. कुणाकडून काय आणि किती करून घ्यायचं हे ईश्वराने आधीच ठरवलेलं असतं, त्याप्रमाणे तो करून घेत असतो. ईश्वरी कार्य होण्यासाठी मनुष्य एक साधन असतो. म्हणजे मनुष्य हे ईश्वरचलीत एक यंत्र आहे असं म्हंटलं तरी चालेल. यंत्र हे केवळ चालकाच्या मर्जीनुसार चालतं आणि यंत्रानं केलेल्या कामाचं फळ हे यंत्र चालवणाऱ्याच्या मालकीचं असतं हे लक्षात घेतलं तर मग कर्म करणाऱ्या यंत्राचा फळावर अधिकार असू शकत नाही ही बाब स्पष्ट होते. हे एकदा मनावर ठसलं की, कर्मफळाचा त्याग मनापासून घडत जातो, बुद्धी आपोआपच नि:स्पृह होत जाते. त्यामुळे मनातलं विचारचक थांबून ईश्वराप्रति ध्यान उत्तम लागतं कारण अपेक्षा संपल्याने ईश्वरप्राप्ती हा एकमेव ध्येयविषय असतो. अशा माणसाची मन:शांती ही दासी होते आणि त्याला ब्राम्हीस्थिती प्राप्त करून देते. म्हणून कर्मफळाच्या त्यागापासून सुरु झालेला हा प्रवास माणसाला शांतिरुप करून ब्राम्हीस्थिती प्राप्त करून देतो. एकदा ही प्राप्त झाली की, त्यापासून माणूस कधीही ढळत नसल्याने त्याच्या अंतकाळी ती त्याला ब्रह्मनिर्वाण मिळवून देते.
बाप्पा पुढील श्लोकातून त्यांच्या आवडत्या भक्ताचे वर्णन करतायत. ते म्हणतायत, शत्रूमित्र, लाभालाभ, सुखदु:ख यासर्वांबद्दल तटस्थ असलेला भक्त मला प्रिय असतो.
निरहंममताबुद्धिरद्वेषऽ शरणऽ समऽ ।
लाभालाभे सुखे दु:खे मानामाने स मे प्रियऽ ।।15।। अर्थ-अहंकार व ममत्वबुद्धी यांनी विरहित असलेला, द्वेषरहित, लाभ-हानी, सुख-दु:ख व मान-अपमान यांचे ठिकाण जो सम असेल तो मला प्रिय आहे.
विवरण-जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला प्रिय होते तेव्हा त्या व्यक्तीत असलेली लक्षणे किंवा गुण त्याला कारणीभूत असतात. ह्या आणि पुढील दोन तीन श्लोकात बाप्पा त्यांना प्रिय असलेल्या भक्ताच्या लक्षणांबद्दल बोलतायत. आपण सर्वांनी ‘त वरून ताकभात’ ओळखून ती लक्षणे आपल्यात प्रकट होण्यासाठी प्रेमपूर्वक बाप्पांची भक्ती करूयात. त्याआधी त्या लक्षणांचा सविस्तर अभ्यास करूयात.
अहंकार विरहित असणे हा भक्ताचा पहिला गुण आहे. आपले शरीर, इंद्रिये, आपल्या मालकीची आहेत अशा थाटात मनुष्य वावरत असतो. त्याचा त्याला अहंकार वाटत असतो. त्यातूनच इतरांविषयी मनात तुच्छतेची भावना निर्माण होते. परंतु भक्त ईश्वराशी अनुसंधानाने बांधला गेलेला असल्याने त्याच्या अंत:करणात अलौकिक गुण प्रकट होऊ लागतात व ही सर्व ईश्वराची देणगी आहे ह्याची जाणीव असल्याने तो अहंकारविरहीत होतो.
पुढील गुण ममतारहित असा आहे. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दलची ममता मालकी भावनेतून निर्माण होते. माझे घर, माझी गाडी, माझी मुले इत्यादि. ही यादी बरीच लांबू शकते. आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व गोष्टी ईश्वराच्या मालकीच्या आहेत आणि त्याने त्याच्या मर्जीनुसार आपल्याला काही काळ वापरायला दिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती लक्षात न घेतल्याने त्या वस्तू व व्यक्तींबद्दल मनुष्य ममता बाळगत असतो.
क्रमश: