मळेकरणीत बकरी बळी बंदीच्या निर्णयाला भाविकांचाही प्रतिसाद
पोलीस, ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ ठाण मांडून
वार्ताहर /उचगाव
उचगावच्या मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये नवस फेडण्यासाठी म्हणून दिल्या जाणाऱ्या पशुहत्या बंदीला उचगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाला भाविकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. मंगळवार दि. 4 जून रोजी यात्रेसाठी एकाही भाविकाने बोकड अथवा कोंबडे बळी देण्यासाठी आणले नाही. मात्र मंदिरात नित्यनेमाने होणारी पूजा, अर्चा, नवस, ओटी भरण्यासारखे धार्मिक विधी सुरळीत सुरू होते. सदर पशुहत्या आणि यात्रा या प्रथेला आता इथून पुढे पूर्ण विराम मिळालेला आहे. उचगाव गावाच्या संस्कृतीमध्ये बिघडत चाललेल्या अनेक प्रकारामुळे उचगाववासियांचे जीवनमान बिघडत चालले होते. याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्यानेच उचगाव ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो म्हणजे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये पशुहत्येला निर्बंध घालणे. मळेकरणी देवीच्या आमराईत आणि परिसरातील मंगल कार्यालयांतून होणाऱ्या देवीच्या यात्रेचे अनेक दुष्परिणाम उचगावमधील नागरिकांच्यावर होत असल्याचे चित्र दिसून येत होते. आणि यामुळेच ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे या पशुहत्या सर्वप्रथम बंद पाडण्यासाठी शड्डू ठोकूनच उभे ठाकले आणि अखेर ही प्रथा आता बंद पाडली. यामुळे उचगाव आणि परिसरातील जनतेला होणाऱ्या अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. तो आता थांबला आहे.
मंगळवारी सकाळीच पोलीस तैनात
मंगळवारी सकाळी पहाटेपासूनच पोलीस फाटा हजर होता आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव ग्रामीणचे सीपीआय उमेश एम.,काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय यांनी सकाळच्या वेळेत सातत्याने भेट देऊन या ठिकाणी चाललेला चोख पहारा आणि येथील व्यवस्था याची पाहणी केली. तसेच उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, बी. एस. होनगेकर, पुंडलिक कदम पाटील, लक्ष्मण होनगेकर, मधुकर जाधव, बंटी पावशे, एल. डी. चौगुले, यादो कांबळे, रोहन कदम, माऊती खांडेकर, शशिकांत जाधव, सदानंद पावशे, मनोहर कदम, मनोहर होनगेकर, अशोक हुक्केरीकर, गणपती पावले, संभाजी कदम, रामा कदम यासह उचगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उचगाव मळेकरणी देवीच्या मार्गाच्या प्रारंभीच मंडप घालून सर्वजण ठाण मांडून बसले होते.