CM देवेंद्र फडणवीसांनी बोलवली तातडीची बैठक, भारत-पाक तणावावर दिले आदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे
Devendra Fadnavis Meeting : भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामध्ये देशातील विविध राज्यात शासन, प्रशासन अलर्ट मोडवर आला आहे. मुंबई, पुण्यासह ठिकाठिकाणी महत्वाच्या शहरांत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून सीमाभागांत हल्ले सुरु आहेत. परंतु भारतीय सैन्य त्या हल्ल्यांना उधळून लावत आहे.
पाकच्या सर्व हालचालींवर भारताचे लक्ष असून तातडीने योग्य ती कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय सैन्य मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दादर चौपाटी, महत्वाची मंदिरे येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
काल रात्री भारताच्या सीमाभागातील राज्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे सतर्क राहणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. याआधी राज्याच्या राजधानी शहराला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं आहे. त्यामुळे समजा, आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर काय करायचे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले.
प्रशासकीय यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी कोणते आदेश दिले?
प्रत्येक जिल्हा पातळीवर वॉर रूमची स्थापना करा. ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करुन सर्वांना त्याची माहिती द्या. सैन्याच्या तयारी संबधित चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, कुणी असे केल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवण्यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा, पोलीस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा, अशा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.