Ashadhi Wari 2025: 'संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती हे माझं भाग्य'
हा माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे
Devendra Fadnavis In Dehu : भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षे आक्रमणातूनही देवतांचे आणि संस्कृतीचे रक्षण केले आहे. त्यामुळेच देशातून आणि महाराष्ट्रातून भाविक पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जातात. शेकडो वर्षांपासून वारीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणे हे माझ्यासाठी भाग्याचे असून अतिशय आनंद झाला असल्याचे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहिलो. हा माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन अतिशय आनंद झाला आहे.
तुमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलीसांनी सुव्यवस्था केली आहे. दर्शनासाठी एकाच वेळी सगळ्यांना सोडलं तर खूप गर्दी होईल. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेत प्रशासनाला मदत करु असे आवाहन त्यांनी वारकऱ्यांना केले. दर्शनासाठी थोडे थोडे वारकरी सोडावे लागणार आहेत, कारण वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमचा वारकरी अशा गोष्टींची पर्वा करत नाही. कारण माऊलीच्या भेटीकरता ते अनेक किलोमीटर पायी जातात. त्यामुळे वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेइल याची खात्री आहे असंही ते म्हणाले.