Satara : दरेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड...!
सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
by इम्तियाज मुजावर
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे त्यांच्या शेतात 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी सकाळपासून शेतीच्या कामात आपला स्वतः सहभाग नोंदवला . काल साताऱ्यातील एका सभेनंतर ते दरेगावात मुक्कामी होते. दरेगावात आल्यानंतर ते आपल्या शेताच्या कामात रमल्याचे पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून दूर राहून नैसर्गिक शेतीकडे वळावे
शेती ही माझी ओळख असून गावी आलो की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. झाडे लावणं ही केवळ माझी आवड नाही तर जबाबदारी आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून दूर राहून नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाबळेश्वर तालुक्यात सेंद्रिय आणि बांबू शेतीला चालना देण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सध्या सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेती तर 9 हजार हेक्टरवर बांबू लागवड सुरू आहे. या भागात स्ट्रॉबेरी, एवोकॅडो, ब्लूबेरी, मलबेरी, पेरू, आंबा, काजू, फणस, पपई, चिकू, चंदन, रक्तचंदन आणि अगरवूड यांसारख्या फळबागांची लागवडही केली जात आहे.
गटशेतीच्या माध्यमातून 50 ते 100 शेतकऱ्यांना एकत्र करून सामूहिक फळबाग शेती आणि फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरच फळप्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना थेट नफा मिळू शकतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेती ही आत्मसंतोषाची वाट असून, पर्यावरण जपत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हेच खरे देशसेवेचे रूप आहे, असेही त्यांनी नमूद केले. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या 350 हून अधिक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
भविष्यात हा भाग नैसर्गिक शेतीचे एक आदर्श केंद्र ठरेल
बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उद्योजकतेचा नवा मार्ग उपलब्ध झाला असून, अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीत बांबू बायोप्रॉडक्ट उद्योगांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच विविध कंपन्या या भागात बांबू उत्पादनांच्या खरेदीसाठी येणार आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही या परिसरात वृक्षारोपण, सेंद्रिय शेती आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना मिळत असून भविष्यात हा भाग नैसर्गिक शेतीचे एक आदर्श केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.