बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्याची मागणी
खानापुरात हिंदू संघटनांचा मोर्चा : तहसीलदारांना दिले निवेदन
खानापूर : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्यावतीने हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी 25 रोजी खानापूर तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांना निवेदन देण्यात आले. गृहमंत्री जी. परमेश्वर, तसेच बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना खानापूर तहसीलदारांमार्फत हे निवेदन दिले. लक्ष्मी मंदिर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राजा शिवछत्रपती चौकात मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आली. तहसीलदार कार्यालयात मोर्चा आल्यावर मल्लाप्पा मारिहाळ यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बजरंग दलाचे तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, संजय कुबल, भरमाणी पाटील, सुरेश देसाई, सुनीता पाटील, चेतन मनेरीकर, बसवराज सानिकोप, बाबुराव देसाई, तसेच पंडित ओगले यांनी गोहत्येचा निषेध करत तालुक्यात अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांना निवेदन दिले. निवेदनात कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिझर्वेशन ऑफ कॅटल अॅक्ट 2020 अंतर्गत गायी, वासरे व प्रतिबंधित जनावरांच्या कत्तलीवर बंदी असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच बकरी ईद काळात प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी लक्ष्मण बामणे, अशोक देसाई, चांगाप्पा बाचोळकर, राजेंद्र रायका, रवी काटगी, प्रकाश देशपांडे, विश्वास किरमटे, पंकज कुट्रे, सदानंद मासेकर, राजू कलाम व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.