For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खरीपसाठी 41 हजार क्विंटल बियाणांची मागणी

10:29 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
खरीपसाठी 41 हजार क्विंटल बियाणांची मागणी
Advertisement

कृषी खात्याची तयारी : बी-बियाणे, खते पुरविण्यासाठी धडपड

Advertisement

बेळगाव : यंदाच्या खरीप हंमागात कृषी खात्याने 41 हजार 61 क्विंटल बी-बियाणांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी पावसाअभावी मोठ्या प्रमाणात बी-बियाणे गोडावूनमध्ये पडून राहिले होते. मात्र यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बी-बियाणांची मागणी वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कृषी खात्याने येणारा खरीप हंगाम साधण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात 7.40 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे बी-बियाणेही मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. एकूण 41 हजार 61 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये भात 850 क्विंटल, ज्वारी 40 क्विंटल, मका 6354 क्विंटल, तूर 531, उडीद 402, भुईमूग 14 आणि सोयाबिन 31788 क्विंटल पुरविले जाणार आहे. जिल्ह्यातील रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघ आणि स्थापन करण्यात आलेल्या तात्पुरत्या केंद्रांमधून बी-बियाणे पुरविली जाणार आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा तुटवडा निर्माण होणार नाही. याची काळजीही कृषी मार्फत घेतली जाणार आहे. विशेषत: सर्वाधिक सोयाबिन बियाणांचा पुरवठा केला जाणार आहे. तेलाच्या किमती वाढल्याने भुईमूग आणि सोयाबिनचे क्षेत्र वाढले आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये अनावश्यक बी-बियाणांचा भरणा अधिक केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी दुकानांतून बी-बियाणे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे दरवर्षी फटका बसू लागला आहे. स्थानिक शिवारात जी पिके येतात तीच बियाणे उपलब्ध करावीत, अशी मागणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र दरवर्षी शेतकऱ्यांची निराशा होऊ लागली आहे आणि बी-बियाणांसाठी हजारो रुपये भुर्दंड सोसावा लागत आहे. यंदा समाधानकारक वळीव पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांनाही वेग आला आहे. वेळेत खरीप हंगाम सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासाठी कृषी खात्यालाही वेळेत बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरवावी लागणार आहेत. शिवाय कृत्रीम टंचाई निर्माण करून बी-बियाणे आणि खते विकणाऱ्यांवर नजर ठेवावी लागणार आहे.

बी-बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही

जिल्ह्यात 7.40 लाख हेक्टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार बियाणे आणि खते व यंत्र सामुग्री पुरविली जाणार आहे. सर्व रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये बी-बियाणे ठेवली जाणार आहेत. कोठेही बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही.

- शिवनगौडा पाटील-सहसंचालक कृषी खाते

Advertisement
Advertisement
Tags :

.