दिल्ले सरकार कारागृहात चालणार नाही
उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची स्पष्ट भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असली आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला, तरी दिल्लीचे सरकार कारागृहातून चालणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली आहे. अशा प्रकारे सरकार चालविणे अयोग्य आहे. ते नियमाला धरुन नाही, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी बुधवारी केले आहे.
21 मार्च या दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दिल्लीच्या न्यायालयाने सहा दिवसांची ईडी कोठडीही दिली आहे. या कोठडीचा कालावधी आज गुरुवारी संपत आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या गाजलेल्या मद्यविक्री धोरण घोटाळ्यासंदर्भात अटक झालेली आहे.
आम आदमी पक्षाचा दावा
केवळ अटक करण्यात आली म्हणून मुख्यमंत्र्याने राजीनामा द्यावा, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. त्यामुळे केजरीवाल हे कारागृहातूनच सरकार चालवितील. त्यांना कारागृहात सरकार चालविण्यायोग्य सुविधा दिल्या जाव्यात, अशी मागणी उच्च न्यायलयात केली जाणार आहे. कारागृहातच त्यांना कार्यालय स्थापन करण्याची अनुमती देण्याचीही मागणी न्यायालयाकडे केली जाणार आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपराज्यपालांनी बुधवारी ही स्पष्टोक्ती केली आहे.
कायदेतज्ञांमध्ये मतभिन्नता
मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली, तर तो कारागृहातून सरकार चालवू शकतो का, या मुद्द्यावर कायदेतज्ञांमध्येही मतभिन्नता आहे. काहींच्या मते असे सरकार चालविण्याला कायद्याची आडकाठी नाही. तर काही तज्ञांच्या मते हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून नैतिकतेचाही प्रश्न आहे. तसेच कार्यालय स्थापन करण्याची सुविधा कारागृहात नियमांप्रमाणे दिली जाऊ शकत नाही, असेही काहीना वाटते.