पाणी संकटाबाबत दिल्ली सरकार कोर्टात
सर्वोच्च न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर भारतात उष्णतेची लाट सुरू असतानाच दिल्लीत दिवसेंदिवस पाण्याचे संकट वाढत आहे. याचदरम्यान, दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीतील जलसंकट लक्षात घेऊन हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधून राज्यासाठी महिनाभर अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केजरीवाल सरकारने एका याचिकेच्या माध्यमातून केली आहे.
दिल्ली सरकारच्या जलसंपदा मंत्री आतिशी यांनी अलीकडेच भाजपशासित हरियाणा या राज्यावर यमुनेचे पाणी रोखल्याचा आरोप केला होता. 1 मे पासून दिल्लीच्या वाट्याचे पाणी अचूक प्रमाणात न दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच यमुनेच्या पाणीपुरवठ्यात येत्या काही दिवसांत सुधारणा न झाल्यास दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिल्लीतील जनतेसाठी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.