For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला

03:47 PM Feb 24, 2025 IST | Radhika Patil
बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला
Advertisement

सिंधुदुर्गनगरी : 

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने ’मराठा लष्करी भूप्रदेश’ ( Maratha Military Landscape of India ) या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी
प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युनेस्को’कडे पाठविला, त्याबद्दल मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही शेलार यांनी आभार मानले आहेत.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्व आणि जतन सुनिश्चित होईल, अशी आशा शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.