दिल्लीत दोन काँग्रेस नेत्यांचा पक्षत्याग
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी काँग्रेसमधील त्यांच्या सर्व पदांचा त्याग केल्याच्या पाठोपाठ या पक्षाला आणखी धक्का बसला आहे. दिल्लीच्या दोन माजी आमदारांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे. त्यांची नावे नीरज बासोया आणि नसीब सिंग अशी आहेत. आम आदमी पक्षाशी युती करण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा निषेध म्हणून आपण काँग्रेसचा त्याग करीत आहोत, असे या माजी आमदारांनी पत्रकारांसमोर बुधवारी स्पष्ट केले.
या दोन ज्येष्ठ नेत्यांचा राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आम आदमी पक्षाशी युती ही काँग्रेससाठी मोठीच लाजिरवाणी बाब आहे. या युतीमुळे काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. काँग्रेसला नावे ठेवली जात आहेत. त्यामुळे आता या पक्षात राहणे असह्या झाल्याने आम्ही राजीनामा देत आहोत, असे या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांनी आम आदमी पक्षावर टीकाही केली.
काँग्रेसमधील विसंगतीवर बोट
नसीब सिंग यांनी काँग्रेसच्या विसंगतीवर बोट ठेवले आहे. काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती केली आहे. मात्र, पंजाबमध्ये त्या पक्षाने युतीस नकार देत सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसने या पक्षासमोर माघार घ्यावयास नको होती. काँग्रेसचे दुबळेपण यामुळे दिसून आले, असे त्यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात प्रतिपादन केले. पंजाबमध्ये काँग्रेसच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष देविंदर यादव हे आम आदमी पक्षावर कडाडून टीका करतात. तर दिल्लीत तेच नेते या पक्षाची प्रशंसा करतात. या विसंगतीमुळे काँग्रेसचे हसे होत आहे, अशी मल्लिनाथी सिंग यांनी त्यांच्या पत्रात पुढे पेलेली आहे.
दिल्ली काँग्रेसमध्ये उघड फूट
दिल्ली काँग्रेसमधील मतभेद गेल्या चार दिवसांमध्ये चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे दिल्ली प्रभारी दीपक बाबरिया मनमानी करत आहेत. दिल्ली काँग्रेस समितीने घेतलेल्या सर्व निर्णयांवर त्यांनी बोळा फिरविला आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेले कन्हय्याकुमार हे त्यांचा हट्ट चालवत आहेत. अशा परिस्थितीत जुन्या एकनिष्ठ नेत्यांना पक्षात किंमत राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही अवमान सहन करत पक्षात राहणार नाही, अशी भूमिका अनेक नेत्यांनी घेतली आहे.