भारतीय महिला तिरंदाजपटूंना पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)
येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्र फेरीच्या अंतिम तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला रिकर्व्ह संघाला युक्रेनकडून अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या सांघिक रिकर्व्ह उपउपांत्यफेरीच्या लढतीत युक्रेनने भारताचा 5-3 असा पराभव केला.
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता भारतीय महिला तिरंदाजपटूंना आपल्या पात्रतेसाठी अंतिम मानांकनावर अवलंबून रहावे लागेल. भारतीय महिला रिकर्व्ह संघाला या स्पर्धेत पाचवे मानांकन मिळाले असल्याने त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली होती. ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या कोटा पद्धतीनुसार पात्रता सिद्ध करण्यासाठी भारताच्या महिला तिरंदाजपटू संघाला एलिमिनेशनमध्ये दोन विजय मिळविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या रिकर्व्ह विभागात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणारे 4 संघ कोटा पद्धतीनुसार ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.
भारत आणि युक्रेन यांच्यातील महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारातील लढतीत युक्रेनने भारताचा 3-3 असा पराभव केला. या स्पर्धेत दीपिकाकुमारी, भजन कौर आणि अंकिता भक्त यांचा भारतीय संघात समावेश होता. मात्र नवोदीत अंकिता भक्त आणि भजन कौर यांना दर्जेदार कामगिरी करता आली नाही. आता या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह पात्र फेरीला शनिवारी प्रारंभ होत आहे. या पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत 80 देशांचे सुमारे 300 तिरंदाजपटू सहभागी झाले आहेत. 26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारतीय महिला रिकर्व्ह संघाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची अद्याप संधी असल्याचे सांगण्यात आले. कारण पात्र फेरीच्या नियमामध्ये नवा बदल करण्यात आला आहे. भारतीय महिला रिकर्व्ह संघ सध्या मानांकनात आठव्या स्थानावर आहे. या मानांकनात दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, मेक्सिको आणि अमेरिका हे भारतापेक्षा पुढे आहेत आणि या देशांनी आपली ऑलिम्पिक पात्रता यापूर्वीच सिद्ध केली आहे.