खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
शेतकरी संघटनेचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन : पावसाचे पाणी अधिक साचल्याने समस्या
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्यात यावर्षी गेले चार महिने दमदार पाऊस पडला. यामुळे शेतातील पिकांचे कुजून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.शेतकऱ्यांना पीक पिकविण्यासाठी बियाणे, रासायनिक खते, औषधे यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यासाठी बँका, पथसंस्था व खासगी सावकाराकडून कर्जाऊ रक्कम घ्यावी लागते. असे असताना यावर्षी पीक बऱ्यापैकी उगवून आल्यानंतर खते, औषधे घातल्यानंतर सातत्याने मोठ्या पावसाला सुरवात झाली.
तब्बल तीन महिने मोठा पाऊस झाल्याने शेतवडीत पाणी साचून राहिले. परिणामी अती पाणी साचून राहणाऱ्या पानथळ जमिनीतील भात, ऊस, पीक कुजून गेले तर कमी पाण्याच्या जमिनीतील मका, जोंधळा, भुईमूग पिकांची मुळे कुजून गेली. सुरवातीला हिरवीगार असलेली पिके पिवळी झाली. त्यामुळे पिकांवर मोठा खर्च करूनही नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडावे याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मुख्य मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवाय नुकसानग्रस्ताना नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा
खानापूरसह राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे,तसेच शेतकऱ्यांच्या पंपसेटना नवा विद्युत कायदा जारी करण्यापेक्षा जुनाच कायदा करावा, यासह अन्य मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदनाची प्रत महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा, जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. ग्रेड टू तहसीलदार राकेश यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नेते किशोर मिठारी, दत्ता बिडकर, गोपाल अगसीमणी, कुतुबुद्दीन शेख, यल्लाप्पा बेळगावकर, कूश पाटील, भरमाणी पाटील, जोतिबा सुतार, रवि पाटीलसह शेतकरी उपस्थित होते.