विषारी पाणी पिल्यामुळे गायी-बकऱ्यांचा मृत्यू
संतिबस्तवाड परिसरात हळहळ : शेतकऱ्याचे सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान, अन्य कांही जनावरांवर उपचार सुरू
वार्ताहर /किणये
विषारी पाणी पिल्यामुळे संतिबस्तवाड येथील दोन गायी व चार बकऱ्यांचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास संतिबस्तवाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शिवारात घडली. शेतकऱ्याची बकरी व गायी मृत्युमुखी पडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे. संतिबस्तवाड गावातील यल्लाप्पा परशराम चनीकोप यांनी आपली जनावरे व बकरी रोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी चरण्यासाठी सोडली होती. संतिबस्तवाड रस्त्याच्या बाजूला एका शिवारात पाण्याचा बॅरेल ठेवण्यात आला होता. कडक उन्हामुळे साहजिकच त्या जनावरांना तहान लागली असणार. यामुळे त्या जनावरांनी त्या बॅरेलमधील पाणी पिले हेते. मात्र सदर बॅरेलमधील पाणी हे विषारी होते. हे पाणी पिल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात दोन गायी व चार बकरी मृत्युमुखी पडल्या. हा प्रकार पाहून यल्लाप्पा चनीकोप या शेतकऱ्याने एकच आक्रोश केला. आजूबाजूला जाणारे नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.