ढगांद्वारे पर्वतीय भागात पोहोचतोय जीवघेणा धातू
हिमालयासंबंधी भीती वाढविणारा अहवाल
पर्वतीय भागातील हवा आणि ढग नेहमी साफ अन् शुद्ध असतात, असे तुमचे मानणे आहे का? अलिकडेच झालेल्या संशोधनातून ढग धूळ आणि प्रदूषणाने युक्त अवजड धातूंना भारतातील पर्वतीय भाग, म्हणजेच पूर्व हिमालय आणि पश्चिम घाटापर्यंत नेत असल्याचे समोर आले आहे. हे धातू आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत.
हे अध्ययन एनव्हायरन्मेंटल अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. ढग कॅडमियम (सीडी), निकोल (एनआय), कॉपर (सीयू), क्रोमियम (सीआर) आणि झिंक (झेडएन) यासारख्या अवजड धातूंना घेऊन येत असल्याचे अहवालात नमूद आहे. हे धातू केवळ कॅन्सरसारखे धोकादायक आजार निर्माण करतात असे नाही, तर हाडांचा कमकुवतपणा, किडनी समस्या आणि मुलांमध्ये मानसिक विकासाच्या समस्याही निर्माण करू शकतात. कोलकात्यातील बोस इन्स्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.

कसे झाले संशोधन
वैज्ञानिकांनी 2022 मध्ये उन्हाळ्याच्या अखेरपासून मान्सून सुरू होईपर्यंतचे नमुने मिळविले. हे नमुने पश्चिम घाटात महाबळेश्वर (आयआयटीएम कॅम्पस) आणि पूर्व हिमालयात दार्जिलिंग (बोस इन्स्टीट्यूट)मधून प्राप्त करण्यात आले. मान्सूनचे ढग बंगालच्या उपसागराच्या मार्गे पश्चिम घाटातून हिमालयापर्यंत पोहोचतात. वैज्ञानिकांनी पाऊस न पाडणाऱ्या (नॉन-प्रेसिपिटेटिंग क्लाउड) ढगांचे अध्ययन केले असता त्यात धातूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. वैज्ञानिकांनी सूर्यप्रकाशात हे धातू रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज (आरओज) तयार करतात, जे डीएनएला नुकसान पोहोचवून कॅन्सरचे कारण ठरू शकतात, असे सांगितले आहे.
हे धातू हानिकारक
हे धातू हवेत तरंगत राहतात आणि श्वसन, पिण्याचे पाणी किंवा त्वचेच्या संपर्कात येत शरीरात पोहोचतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
निकोल (एनआय) आणि क्रोमियम (सीआर) : त्वचेवर अॅलर्जी आणि अस्थमासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कॅडमियम (सीडी) : हाडांना ठिसूळ करते, किडनीला नुकसान पोहोचविते.
क्रोमियम (सीआर) : श्वसनाद्वारे आत पोहोचल्यावर फुफ्फुसांच्या पॅन्सरचा धोका वाढतो.
दीर्घकालीन प्रभाव : फुफ्फुसे, यकृत आणि किडनीचे आजार, हृदयरोग आणि मानसिक समस्या होऊ शकते.
मुलांना धोका : मुले या धातूंनी 30 टक्क्यांनी अधिक प्रभावित होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदयरोग आणि मानसिक मंदतेचा धोका वाढतो.
कुठून येत आहेत धातू
हे धातू मैदानी भागांमधून ढगांद्वारे पर्वतांपर्यंत पोहोचत आहेत. यामागे मानवी घडामोडी जबाबदार आहेत.
वाहतूक आणि प्रदूषण : रस्त्याची धूळ, वाहनांचा धूर आणि कोळशाचा वापर.
शहरी कचरा : शहरात कचरा जाळल्याने हे धातू हवेत मिसळले जातात.
पर्यटनाचा ताण : पर्यटनस्थळांवर वाहनांची गर्दी अन् स्थानिक प्रदूषण.
निसर्गाचे योगदान : माती खचल्याने देखील धातू हवेत मिसळले जातात.
प्रदूषित शहरांवरील ढग ग्रामीण भागांमधील ढगांच्या तुलनेत अधिक धातूंनी भरलेले असतात, जे पाऊस पाडत नाहीत. त्यात धातूंचे प्रमाण खूपच अधिक असते असे अध्ययनात आढळून आले आहे.