पंचेचाळीस भारतीयांचे मृतदेह कोचीत
कुवेतमधील आग दुर्घटनेत कर्मचारी होरपळले
वृत्तसंस्था / कोची
कुवेत देशात तीन दिवसांपूर्वी झालेल्या आग दुर्घटनेत मृत झालेल्या 45 भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यात आले असून त्यांना घेऊन येणारे भारतीय वायुदलाचे विमान केरळमधील कोची येथे आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग यांनी या दुर्घटनेतंतर कुवेतला जाऊन हे मृतदेह भारतात आणले आहेत. मृतदेहांना घेऊन येणाऱ्या विमानात त्यांच्यासह काही उच्चपदस्थ अधिकारीही होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्तीवर्धन सिंग यांना त्वरित कुवेतला जाण्याची सूच्ाना केली होती. त्यानुसार सिंग गुरुवारी कुवेतला गेले. त्यांनी तेथील भारताच्या दूतावास अधिकाऱ्यांना सर्व औपचारिक प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्यास साहाय्य आणि मार्गदर्शन केले. मृतदेहांना सन्मानाने भारतात आणण्यासाठी भारतीय वायुदलाने सी-130 जे या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. मृतांमध्ये भारतातील विविध राज्यांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जास्त कर्मचारी केरळमधील होते.
केरळमधील 23 कर्मचाऱ्यांचा अंत
ही दुर्घटना बुधवारी घडली होती. या दुर्घटनेत 50 कर्मचारी मृत झाले होते. त्यांच्यापैकी 45 भारतीय होते. हे कर्मचारी वास्तव्यास असलेल्या इमारतीला भीषण आग लागून इमारत भस्मसात झाली होती. आग लागली तेव्हा कर्मचारी झोपेत असल्याने ते स्वत:ला वाचविण्यासाठी त्वरित हालचाल करू शकले नाहीत. काही कर्मचाऱ्यांनी खिडक्यांमधून खाली उड्या टाकून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. एका कर्मचाऱ्याने तिसऱ्या मजल्यावरुन खालच्या पाण्याच्या तलावात उडी मारल्याचे त्याचा जीव वाचल्याचीही घटना घडली आहे. तथापि, अनेक कर्मचारी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. 45 मृतांपैकी 23 केरळमधील असून तामिळनाडूतील सात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 3, ओडिशातील 2 तर बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणा येथील प्रत्येकी 1 कर्मचारी आहे. बळी पडलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्या-त्याच्या राज्यात पाठविण्यात येत असून नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यात येत आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग
या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासाअंती स्पष्ट होत आहे. प्रारंभी ही आग स्वयंपाकघरातील गॅससिलिंडरमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. तथापि, संपूर्ण इमारतीला ज्या वेगाने आगीने वेढले आणि ज्या झपाट्याने आग पसरली, ते पाहता ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असे अनुमान काढण्यात आले होते. ते प्राथमिक तपासाअंती खरे असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेह ओळखण्यापलिकडे
बहुतेक मृतदेहांची ओळख पटविणे कठीण होत आहे. कारण ते आगीत पूर्णत: जळाले आहेत. त्यामुळे डीएनएच्या चाचणीच्या माध्यमातून अनेक मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. या आगीत फिलिपाईन्स देशाचे तीन नागरिकही मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आगीच्या कारणांची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन कुवेतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.