दयानंद स्वामी यांची आज मळेकरणी देवस्थानला भेट
ग्रामस्थांसह भाविकांना करणार मार्गदर्शन : परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
वार्ताहर /उचगाव
जागृत मळेकरणी देवीच्या मंदिरासमोरील पशुहत्येवर उचगाव ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांनी बंदी घालून ऐतिहासिक निर्णय घेऊन बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील भाविकांसमोर इतिहासच घडविला. याला सर्व भाविकांनी साथ दिली आहे. यानिमित्त विश्व प्राणी कल्याण मंडळ अध्यक्ष व विश्व गोरक्ष महापीठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी हे मंगळवार दि. 18 जून रोजी मळेकरणी देवस्थानला भेट देऊन येथील परिसराची पाहणी करणार आहेत. तसेच ग्रामस्थ आणि भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.आठवड्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी येथे पशुहत्या करून मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जात असे. याचा त्रास ग्रामस्थांसह कोवाड मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे होत असे. यात्रेनिमित्त मांसाहारी जेवण असल्याने मोठ्या प्रमाणात मद्यपान चालू होते. याचा परिणाम युवा पिढीवर होऊन व्यसनाधीन बनत चालली होती.
शिवाय परिसरातील शेतीवाडीत मद्यपान करून रिकाम्या बाटल्या फोडणे, महिला, युवतींची चेष्टा करणे अशा अनेक समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. याला आळा घालण्यासाठी उचगाव ग्राम पंचायत, ग्रामस्थांसह भागातील अनेक ग्राम पंचायतींनी सहकार्य केले. त्यामुळे भविष्यात कधीही या ठिकाणी पशुहत्या होणार नाही याची खबरदारी शासकीय अधिकारी व पोलीस खात्यानेही घेतली आहे. पशुहत्येबद्दल विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्ष महापीठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी हे आज उचगावला येत असून भाविकांना पशुहत्या कायद्याने कसा गुन्हा आहे. या संदर्भात आपले विचार मांडणार आहेत. बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील नागरिक व भाविकांनी स्वामींच्या मार्गदर्शनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ग्राम पंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष व सदस्यांनी कळविले आहे.
इतर सर्व विधी परंपरेनुसारच
मळेकरणी देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आमराई मंदिरातील देवीची पूजा, अर्चा, ओटी भरणे, गाऱ्हाणा अशा सर्व विधी परंपरेनुसार चालूच राहणार आहेत. केवळ पशुहत्येवर निर्बंध घलण्यात आले आहेत.