कन्या सासुऱ्यासी जाये
कन्या सासुऱ्यासी जाये
मागे परतुनी पाहे
तैसे जाले माझ्या जिवा
केव्हा भेटसी केशवा
जेव्हा माणूस मुलीचा बाप होतो त्या क्षणापासून त्याच्या मनाची तयारी झालेली असते, की मनापासून तिला जपून, वाढवून, सांभाळून शेवटी सासरी धाडून द्यायची आहे. जिचा आपल्या वडिलांवर आणि वडिलांचा तिच्यावर एवढा प्रचंड हक्क असतो, एवढी प्रचंड ओढ असते. जिला आपल्या आणि आपल्या वडिलांच्या मध्ये आपली आई आलेलीसुद्धा खपत नाही. तिच्या आयुष्यात एक दिवस असाही येतो की वडील, आई, ज्या घरात वाढलो ते घर, ते सगळं सोडून जायचं असतं. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला हे निश्चितपणे माहिती असतं, की लग्नाच्या अगोदर असलेली आपली मनोवस्था लग्नानंतरच्या मनोवस्थेहून खूप वेगळी असते. एकदा का तो उंबरठा लग्न करण्यासाठी आपण पार केला की परत मुलगी म्हणून आपण कधीच तो उंबरठा ओलांडू शकत नाही. त्या वेळेला आपल्या मानसिकतेत, आपल्या सगळ्या परिस्थितीत इतका मोठा फरक पडलेला असतो की ते दिवस फिरून येत नाहीत. म्हणून की काय ज्या वेळेला माहेरचा उंबरठा ओलांडून वधू सासरी जाण्यासाठी निघते, त्या वेळेला एकसारखी ती पाठी वळून वळून पाहत असते. ती काय पाहत असेल हे हा अभंग लिहिणाऱ्यांना कळून चुकलं होतं. ती पाहत असते आपलं बालपण. ती पाहत असते आपलं तारुण्य! ती पाहत असते आपलं स्वातंत्र्य. ती हिशोब करत असते आपल्या माहेरी आपण अनुभवलेल्या दिवसांचा. आणि हाही हिशोब करत असते की आता झालेली वजाबाकी पुन्हा बेरजेत कधी येणार नाही या गोष्टीचा. प्रत्येकाच्याच नशिबी सोहळ्याचं लग्न असेलच असं नसतं. अनेक प्रेमविवाह असतात. अनेक मनाविरुद्धचे विवाह असतात. अनेक जबरदस्तीची लग्नं असतात.
प्रत्येक वेळची समस्या वेगळी, प्रत्येक वेळी भावना वेगळी. नक्की काय आणि किती गमावलं आपण? याचा हिशोब लागत नसतो. आणि जिथे जातोय तिथे जाऊन काय कमवणार आहोत याचा अंदाज येत नसतो. खरोखर स्त्राrची त्यावेळची अवस्था ही फक्त तिची तिलाच माहीत असते. तिला हेही माहिती असतं की आयुष्याचं तारू यापुढे आईवडिलांच्या मदतीशिवाय एकटीलाच पुढे न्यायचं आहे. काठावर उभे राहून सल्ला देणारे खूप असतील. पाण्यात मधोमध आपण अडकलेलो असणार आहोत. आणि तुकोबांनी ही अभंग लिहिला त्यावेळी तर अक्षरश: बालविवाह होत असत. सात आणि आठ वर्षांच्या मुली माहेर सोडून सासरी जायला निघताना खरोखर त्यांच्या मनात काय भावना असतील ते त्याच जाणोत. ज्या वयात मुलं आई आई करत आईचा पदर धरून तिच्या मागे मागे फिरत असतात त्या वयात एकाएकी नऊवारी नेसायला लागावी. सासरी जायला लागावं. सासूने दिलेला मार, तिने दिलेले चटके, वयात आल्यावरती केले जाणारे किती समाजमान्य अत्याचार! किती आणि काय म्हणून असेल? इवल्याशा त्या मेंदूतलं विश्व केवढं प्रचंड असेल? म्हणून त्यांनी कन्या असा प्रयोग केलाय. कारण लग्न झाल्यावर ती कन्या राहतच नाही. ती होते सासुरवाशीण! ती कन्या असताना जेव्हा सासरी जायला निघते व इतक्या सगळ्या गोष्टी ती पुन्हा पुन्हा मागे परतून पाहत असते. आणि ती जी विलक्षण कळवळ्याची, आर्ततेची भावना असते तेवढी भावना माझी आहे. माझ्या जीवाला तसाच काच लागलेला आहे ‘केव्हा भेटशी केशवा’? उपमा काय समर्पक असेल! सासरी जाणाऱ्या सासुरवाशिणीची जी तळमळ असते, तेवढी तळमळ माझी ईश्वरभेटीसाठी आहे हे इतक्या सुरेख शब्दात सांगितलं व सामान्य माणसाला ते नाही कळलं तरच नवल! लतादीदींनी गायलेल्या या अभंगाच्या ओळी अक्षरश: काळीज चिरत जातात एवढ्या त्या अर्थवाही आहेत.
सासरी जाणाऱ्या मुलीला माहीत असतं की एकदा का आपण नवऱ्याकडे गेलो की आमंत्रणाशिवाय माहेरी यायचं नसतं. नाहीतर सासरचा नवऱ्याचा मान टिकत नाही. त्यामुळे आता ही रुढी नसली तरी पण किमान खास सणासुदीच्या वेळेला जर लेकीला बोलवायचे असेल तर रीतसर सासरच्यांना आमंत्रण करूनच तिला माहेरी आणलं जातं. पूर्वीच्या काळी तर वर्षानुवर्षं सुद्धा लेकींना माहेराचं तोंड दिसत नसे. म्हणून लग्नानंतर जर माहेरी जायचं असेल तर मग
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली
पाहतसे वाटुली पंढरीची
इतकी जीव ओतून, जीव अडवून त्यांना वाट पहावी लागत असे. स्वत:च्या जन्मदात्यांना भेटण्यासाठी अनिश्चित काळाकरता वाट पाहत राहणे यासारखी दुसरी यातना नसते. त्या मुलीसाठी सुद्धा आणि आई-वडिलांसाठी सुद्धा. ही वेदना जी असते ना, ती त्या मुलीला जाणवलेली असते. म्हणूनच की काय, सासरी जाताना ती वळून वळून माहेरचं दार पहात राहते. आणि सासरी गेल्यावर माहेरुन कुणीतरी निरोप घेऊन येईल, कोणीतरी बोलवायला येईल आणि मला माहेरी नेईल म्हणून एकसारखी ती वाट पाहत असते. आतून तो मांडलेला एक आकांत असतो. काय बोलावं यावर?
भेटीलागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी
माहेरवाशिणीच्या मनातून माहेर कधी जात नाही. शेवटपर्यंत त्या वाट बघतच असतात. मग त्यांना मुली होतात. त्या मोठ्या होतात. त्याही सासरी जातात. आणि आपल्या मुलीला माहेर मिळावं म्हणून माय सासरी नांदते. आपल्या माहेरच्या विरहाचे दु:ख कधी जुनं झालेलं नसतं आणि पुन्हा एकदा नवीन जखम भळभळायला सुरुवात होते. जेव्हा आपली लेक सासरी निघते. शेकडो वर्ष हे चालू आहे. या असंख्य जखमा घेऊन बायका जगतात तरी कशा? हे सगळं पचवतात तरी कशा? हे संताना कळलं होतं. कदाचित म्हणूनच संतांच्याविषयी
‘ऐसी कळवळ्याची रीती करी लाभाविण प्रीती’ हे म्हटलं गेलेलं असेल कारण त्यांना दुसऱ्याचं दु:ख न सांगता कळू शकतं. दुसऱ्याची वेदना बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं. अशा संवेदनशील माणसालाच जगन्मातेच्या डोळ्यांनी पहायला जमतं. म्हणूनच की काय की कन्या सासरी जाणे ह्या प्रसंगावर आजपर्यंत असंख्य गाणी झाली असतील आणि सर्व गाणी लोकप्रिय झालेली आहेत मग ते चालली शकुंतला असो किंवा दाटून कंठ येतो हे गाणं असो योगायोग असा आहे की ह्या दोन्हीही गाण्यांचे चित्रीकरण ज्या अभिनेत्यांवर झालेलं आहे ते स्वत: संगीताचे गाढे अभ्यासक होते. त्यामुळे त्या त्या भूमिका त्यांना फार साजून दिसल्या होत्याच. म्हणून त्याचा परिणाम असा झाला की या गाण्यांच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी चेहऱ्यावर आणलेले भाव हे इतके नैसर्गिक आणि आतून आलेले जाणवतात की गाणं पाहणारा ते गाणं सर्वार्थाने लक्षात ठेवतो. किंबहुना ते गाणं डोक्यातून जातच नाही. कितीही आधुनिक झालो तरी लग्नाच्या पाठवण्याच्या वेळेला विशेषत: मराठी लग्नात आजही ‘दाटून कंठ येतो’ या गाण्याचे सूर वाजतातच आणि मुलीचाच काय पण मुलाचा बापसुद्धा त्यावेळी हळवा होतोच. विवाहाच्या वेळी म्हटले जाणारे काही मंत्र हे चक्क और्ध्वदेहिकाचेही असतात. कारण त्या कन्येचं जुनं आयुष्य संपतं आणि ती एक जबाबदार कर्ती गृहिणी म्हणून, वधू म्हणून, कोणाचीतरी प्रिया म्हणून नव्याने जन्माला येत असते. तो जन्म संपण्याचं प्रतीक म्हणूनच लग्न लागताना वधूच्या आईवडिलांनी पाहू नये अशी पण चाल आहे. आणि ही अवस्था संपणं हे विलक्षण वेदनादायी असतं. ‘लहानपण देगा देवा’ असं तुकाराम महाराजांनीच तर मागून ठेवलंय ना? मग ते लहानपण ज्या घरात दिलं गेलेलं असतं त्या घराविषयी अनिवार ओढ वाटली तर नवल ते काय? तोच विलक्षण कळवळा असणाऱ्या सैगलच्या स्वरांतलं
बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय
हे गाणे ऐकताना ते चक्क असं म्हणतात
चार कहार मोरी डोलीया सजाई रे
मोरा अपना बेगाना छुटो जाये
हे आपलं परकं सगळं काही पाठीच सुटणं म्हणजेच ‘कन्या सासुरासी जाये’! मागेही शून्य आणि पुढेही अथांग!
- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु