राजपूतांची कन्या, जाटांची सून राजस्थानात अद्याप ‘मॅचविनर’
राजस्थानात भाजप कुठल्याही चेहऱ्याला समोर न करता ब्रँड मोदीवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेसकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा चेहरा आहे. भाजपने राजस्थानात पक्षाचा चेहरा म्हणून वसुंधरा राजे सिंधिया किंवा राज्य नेतृत्वापैकी अन्य कुठल्याही नेत्याला सादर न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही वसुंधरा राजे या राज्यात भाजपच्या मॅचविनर आहेत.
पक्षाला योग्य उमेदवार उपलब्ध करविणे, योग्य मुद्दे उपस्थित करण्यापासून अशोक गेहलोत यांना पर्याय म्हणून स्वत:चे गव्हर्नंस मॉडेल सादर करण्यापर्यंत ‘वसुंधरा फॅक्टर’ राजस्थानच्या आगामी निवडणुकीत भाजपला चांगला निकाल मिळवून देऊ शकतो. भाजपने स्वत:च्या दुसऱ्या यादीत वसुंधरा राजे यांच्या बहुतांश निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजपला बहुमत मिळाल्यास राजे यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी पुरेसे समर्थन मिळणार हे निश्चित होणार आहे. याचाच अर्थ वसुंधरा राजे यांना पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास प्राप्त आहे.
वसुंधरा राजे या सध्या गेहलोत सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्या असून भाजपच्या लढाईचे त्या नेतृत्व करत आहेत. तर पक्षाचे अन्य नेते याप्रकरणी स्पष्ट स्वरुपात मागे पडले आहेत. राजे यांच्या नेतृत्वाखालील मागील भाजप सरकारने महिला सुरक्षेसाठी निर्भया हेल्पलाइन, महिला पोलीस स्थानक, महिला गस्त पथक आणि अभय कमांड सेंटर अशाप्रकारच्या अनेक उपाययोजना केल्या होत्या. तर काँग्रेस शासनकाळात या उपाययोजना गुंडाळण्यात आल्याचा दावा टीम वसुंधरा करत आहे. वसुंधरा राजे या मतदारांसमोर राज्याचे स्थानिक मुद्दे उपस्थित करत आहेत. यात पाणी आणि पायाभूत सुविधासंबंधी मुद्दे सामील आहेत. तसेच सत्तेवर आल्यास रिंग रोड पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून दिले जात आहे.
भाजपच्या सर्वात लोकप्रिय नेत्या
वसुंधरा राजे सिंधिया यांना भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात नसले तरीही त्याच पक्षाच्या सर्वात लोकप्रिय नेत्या ठरल्या आहेत. राजे यांचा प्रभाव आणि जातीय मतपेढी भाजपच्या बाजूने मतदारांना एकजूट करण्यास सक्षम आहे. तर राजस्थान भाजपमधील अन्य नेते केवळ एक विशेष जात राजपूत किंवा जाट किंवा अन्य समुदायाला एकजूट करू शकतो.
वसुंधरा राजे यांनी राजस्थानच्या सर्व जातीय समीकरणांवर स्वत:चा प्रभाव पाडला असून संभाव्य स्वरुपात भाजपच्या बाजूने त्यांना एकजूट देखील केले असून यात जाट, गुज्जर आणि राजपूत देखील सामील आहेत. राजे या स्वत:च्या पार्श्वभूमीमुळे राजपूत मतदारांना आकर्षित करू शकतात. तसेच ‘जाट सून’ असल्याने जाटांचे समर्थन देखील मिळवू शकतात. याचबरोबर त्यांचे पुत्राने राज्यातील आणखी एक प्रभावशाली गुज्जर समुदायाच्या मुलीसोबत विवाह केला आहे. याचमुळे वसुंधरा राजे यांना ‘राजपुतों की बेटी, जाटों की बहू और गुज्जरों की समधन’ म्हटले जाते.