किणये येथे घडले बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांचा उपक्रम: आज सायंकाळपर्यंत घेता येणार दर्शन
वार्ताहर /किणये
किणये डोंगरपायथ्याशी, निसर्गरम्य अशा परिसरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय किणये हे केंद्र गेल्या अनेक वर्षापासून अध्यात्माचा प्रचार आणि जागर करीत आहे. यंदा महाशिवरात्रीनिमित्त या केंद्रामध्ये दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंग बनवून ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे या भागात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन भक्तांना घडू लागले आहे. दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहापर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार आहे. आपल्या देशात बारा ज्योतिर्लिंगाचे खूप महत्त्व आहे. जे भक्त या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात ते खरोखरच भाग्यवान समजले जातात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. पण साऱ्यांनाच या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्रत्येक प्रदेशात जाऊन घेणे शक्य नाही. काही शिवभक्त मात्र आवर्जून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात. भाविकांना एकच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता यावे या उद्देशाने किणयेतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या केंद्रात महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. दि. 8 रोजीपासून भाविकांसाठी सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत दर्शनासाठी या केंद्रात प्रवेश देण्यात आलेला आहे. तसेच मंगळवार दि. 12 रोजी या केंद्रात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहापर्यंत या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे.
अनगोळ कारागीराकडून मूर्ती
अनगोळ येथील कारागिरांकडून या बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती बनवून घेण्यात आलेल्या आहेत. सोमनाथ गुजरात, मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश, महाकाळेश्वर मध्य प्रदेश, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, वैजनाथ महाराष्ट्र, भीमाशंकर महाराष्ट्र, रामेश्वर तमिळनाडू, नागनाथ महाराष्ट्र, विश्वेश्वर उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, केदारनाथ उत्तराखंड, घृष्णेश्वर महाराष्ट्र अशी बारा ज्योतिर्लिंग आहेत. या बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा साऱ्यांनाच करता येते असे नाही. त्यामुळे या 12 हुबेहूब मूर्ती किणये येथील या केंद्रामध्ये बनवल्या आहेत.
शिव आराधनामुळे शांती- समाधान
शिव म्हणजे निराकार परमात्मा ज्योती स्वरूप आहे. जगातील सर्वांचे सध्या सदा कल्याण करणारा शिव आहे आणि या शिवाची आराधना केल्यामुळे मनाला शांती, आनंद, समाधान प्राप्त होते. जे लोक शिवाची भक्ती करतात त्यांना जगातील सर्व समस्या धैर्याने पार करण्याचे साहस मिळते. बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन भक्तांना घेता यावे या उद्देशाने इथल्या केंद्रामध्ये या मूर्ती बनवलेल्या आहेत, अशी माहिती बी. के. भारती यांनी दिली.