लोंबकळत्या वीजवाहिन्यांमुळे जीवाला धोका
हेस्कॉमचा गलथान कारभार : वडगाव, अनगोळ, शहापूर, येळ्ळूर शिवारातील चित्र
बेळगाव : वडगाव, अनगोळ, शहापूर व येळ्ळूर शिवारातील विद्युत वाहिन्या लोंबकळत असून यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून खराब झालेल्या विद्युत वाहिन्या केव्हा तुटून पडतील, याची शाश्वती नाही. याविरोधात हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बाळेकुंद्री यांच्या शेतातून अनगोळ, येळ्ळूर, शहापूर भागातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे. मुख्य ट्रान्स्फॉर्मरपासून दूर अंतरावर विद्युतखांब घालण्यात आले आहेत. यामुळे अंतर जास्त असल्याने विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत, त्या त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात विद्युत वाहिन्यांचे तुकडे जोडण्यात आले आहेत. बाळेकुंद्री यांच्या शेतात असणाऱ्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये पावसाळ्याच्या दिवसात बिघाड झाल्यास दुरुस्ती करणेही अशक्य असते. हा ट्रान्स्फॉर्मर बंद पडल्यास आजूबाजूच्या सर्व शेतीचे कृषीपंप बंद होतात. त्यामुळे हा ट्रान्स्फॉर्मर वडगाव-येळ्ळूर रस्त्यानजीक बसविण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे.
विद्युत कनेक्शन देण्यास टाळाटाळ
काही ठिकाणी जुन्या विद्युत वाहिन्या काढून त्या ठिकाणी नवीन विद्युत वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. परंतु, उर्वरित विद्युत वाहिन्या घालण्याचे काम ठप्प आहे. या संदर्भात हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप समस्या सुटलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये कूपनलिका खोदल्या आहेत. परंतु, हेस्कॉमकडून विद्युत कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात असून, पैशांची मागणीही केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
हेस्कॉमच्या रेल्वेस्टेशनसमोरील कार्यालयाजवळ लवकरच आंदोलन
वडगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, यासाठी हेस्कॉमला अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. काही समस्या सोडविण्यात आल्या असल्या तरी अद्याप अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. विद्युत वाहिन्यांची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या विरोधात लवकरच हेस्कॉमच्या रेल्वेस्टेशनसमोरील कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
- राजू मरवे (शेतकरी)