केंबाळी नाल्यातील कचऱ्यामुळे धोका
तातडीने नाला साफ करण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : बेनकनहळ्ळी येथील केंबाळी पुलामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तसेच इतर कचराही फेकून देण्यात आला आहे. याचबरोबर चिकन विक्रेते त्या ठिकाणी चिकनचा कचरा देखील टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बेकनकनळ्ळी ग्रामस्थ तसेच इतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तो नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या ठिकाणी नव्याने पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. मात्र कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड जात आहे. या नाल्यामध्ये गणेशपूर, ज्योतिनगर, क्रांतीनगर, हिंदूनगर, सरस्वतीनगर या परिसरातील गटारींचेही पाणी सोडले जाते. बऱ्याचवेळा कचरा अडकून नाला ओव्हरफ्लो होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. पावसाळ्यात नाल्याचा कचरा रस्त्यावर पसरत आहे.
खोदाई होणे गरजेचे
ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा काढल्याचे दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात कचरा तसाच पडून राहतो. वारंवार या नाल्यामध्ये कचरा साचून राहत आहे. याचबरोबर गाळही साचला आहे. तेव्हा त्याची खोदाई होणे गरजेचे आहे. ग्राम पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. आता लक्ष्मी यात्रा असून त्यापूर्वीच जर सफाई केल्यास त्याचा फायदा होणार आहे.
नाल्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांना धोका
बेनकनहळ्ळी गावाजवळूनच हा नाला गेला आहे. त्यामुळे या नाल्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या नाल्यात बरेच जण कचरा टाकून जात आहेत. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचून आहेत. पावसाळ्यापूर्वी जर कचरा काढला नाही तर मोठा धोका आहे. तेव्हा कचरा काढावा.
मोहन देसूरकर
मोहन देसूरकर परिसरात दुर्गंधी
केंबाळी नाल्याला गणेशपूर परिसरातील दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जाते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्याच्या दोन्ही बाजुला सुपीक जमीन आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना काम करताना समस्या निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा हा नाला साफ करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल पाटील