जंगली डुक्करांकडून ऊस पिकाचे नुकसान
गव्यांकडून हैदोस सुरुच, जंगली जनावरांची संख्या वाढली : खैरवाडमधील शेतकऱ्यांचे 50 हजाराचे नुकसान
वार्ताहर /नंदगड
खैरवाड (ता. खानापूर) येथील शेतवडीतील ऊस व शेंगा पिकांचे जंगली डुक्करांच्या कळपाने खाऊन तुडवून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. खैरवाड गावामधील सर्व्हे नंबर 112 मधील निंगाप्पा भुजगुरव व नारायण भुजगुरव यांच्या शेतातील एक एकर जमिनीमधील शेंगा व ऊस पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे या दोन शेतकऱ्यांचे जवळपास 50 हजाराचे नुकसान झाले आहे.खैरवाड गावच्या पश्चिम व उत्तर दिशेला जंगल आहे. या जंगलातील तीस ते पस्तीस डुक्करांचा कळप रात्रीच्या वेळी ऊस पिकात घुसत आहे.
या कळपाकडून जंगलाजवळ असलेल्या शेतवडीतील ऊस व शेंगा पिकाचा गेल्या काही दिवसांपासून नुकसान करण्याचा सपाटा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी वरील दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतवडीत डुक्करांच्या कळपाने घुसून नुकसान केले आहे.डुक्करांच्या कळपाकडून झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शिवाय यापुढे शेतीवाडीतील पिकात जंगली जनावरे घुसू नयेत यासाठी जंगलाभोवती तारेचे कुंपण घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागात मोठ्याप्रमाणात जंगल आहे. जनावरांची संख्याही वाढली आहे. अन्न-पाण्याच्या शोधात जंगली जनावरे शेतवडीत व मानववस्तीत येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गत आठवड्यात नंदगड व हेब्बाळ गावच्या शेतवडीतील पिकांचे जंगली डुक्करांकडून मोठे नुकसान करण्यात आले होते.
गव्यांकडूनही भात पिकाचे नुकसान
खानापूर तालुक्याच्या जंगलात गव्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गव्यांकडून दिवसाढवळ्या भात पिकाचे तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. झाडनावगा, नंदगड, हलसाल, असोगा आदी भागातील अनेक गावातील शेतवडीत गव्यांकडून भात पिकाचे नुकसान करण्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे गव्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.