नेरसा येथे हत्तीकडून ऊस-भात पिकांचे नुकसान
वनखात्याच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल : तुटपुंजी भरपाई देत असल्याने नाराजी
खानापूर : तालुक्यातील नेरसा येथील शेतकरी अशोक देसाई आणि प्रमोद देसाई यांच्या शेतातील ऊस तसेच भात पिकाचे हत्तीने बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हत्तीच्या बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा टस्कर हत्ती निलावडे, नेरसा परिसरातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करूनदेखील वनखात्याकडून हत्तीच्या बंदोबस्ताबाबत कोणतीच पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन महिन्यापासून हत्ती नेरसा, निलावडे, अंबोळी, मुडगई या परिसरात ठाण मांडून बसला असून हत्तीने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले आहे. शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान हा हत्ती करत आहे. निलावडे पंचायत क्षेत्रातील गावात मागील दोन महिन्यापासून या हत्तीने वायंगण भात आणि उसाचे नुकसान करत आला आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून या हत्तीने आपला मोर्चा पुन्हा नेरसा जंगलात वळविला असून नेरसा गावाला लागून असलेल्या शेतवडीत ऊस आणि भात पिकाचे नुकसान सुरू केले आहे. प्रमोद देसाई यांनी शेताच्या संरक्षणासाठी शेताच्या बाजूने तारेचे कुंपण केले होते.
ते सर्व कुंपण या हत्तीनी नासधूस केले असून प्रमोद देसाई यांचे जवळजवळ दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच 4 एकर शेतीतील ऊस पिकात धुडगूस घातल्याने संपूर्ण ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रमोद देसाई आणि अशोक देसाई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत लोंढा वनखात्याला माहिती देण्यात आली असून या ठिकाणी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पश्चिम भागातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीच नकोसी झाली आहे. काबाडकष्ट करून पिके वाढवायची आणि पिके हातातोंडाशी येताच वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. वनखात्याकडून या नुकसानीची तुटपुंजी भरपाई मिळते. ती मिळवण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी वनखात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. आणि वर्षा दोनवर्षानंतर अगदी तटपुंजी नुकसानभरपाई देण्यात येते.
जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा
हत्तीसह इतर वन्य प्राण्यांच बंदोबस्त करण्यात यावा, म्हणून वेळोवेळी मागणी करुनदेखील वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी निलावडे पंचायत क्षेत्रातील हत्तीनी केलेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या आणि नुकसानभरपाई तातडीने देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या सूचनाकडे गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट होत आहे. हत्तीसह इतर सर्व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.