वळिवाच्या दणक्याने हेस्कॉमचे नुकसान
बेळगाव-खानापुरात 52 विद्युतखांबांसह वाहिन्यांचेही नुकसान : 7 ट्रान्स्फॉर्मर निकामी
प्रतिनिधी/ बेळगाव
वळिवाच्या पहिल्याच दणक्याने हेस्कॉमला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने येळ्ळूर, देसूर, कुरबरहट्टी या परिसरातील पाचहून अधिक विद्युतखांब कोसळले. तसेच झाडांच्या फांद्या पडून विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाल्याने शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.
शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर वीजपुरवठा करणारे विद्युतखांब जमीनदोस्त झाले. यामुळे दुपारी 3 वाजल्यापासून धामणे, येळ्ळूर, देसूर, राजहंसगड या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युतवाहिन्यांवर फांद्या कोसळल्याने नुकसान झाले. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. रात्री उशिरापर्यंत धामणे-राजहंसगड या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, उर्वरित भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉम कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.
येळ्ळूर गावात तीन विद्युतखांब जमीनदोस्त झाले. तर कुरबरहट्टी येथे एक व देसूर येथे एका विद्युतखांबाचे नुकसान झाले. विद्युतखांब कोसळल्याने या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्या परिसराला पर्यायी मार्गाने वीजपुरवठा देण्यात आला. तरीदेखील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हेस्कॉमची 24×7 टीमदेखील या कामामध्ये कार्यरत होती.
रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू
-विनोद करुर (प्रभारी कार्यकारी अभियंते)
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युतखांबांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. काकती येथे 12, खानापूर तालुक्यात 20, येळ्ळूर-देसूर 5 व इतर ठिकाणच्या एकूण 52 विद्युतखांबांचे नुकसान झाले. तर 7 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले.
वळिवामुळे रात्र अंधारात
वळिवाच्या दणक्याने वीजवितरण व्यवस्थेला जोरदार फटका बसला. रात्री 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, मोठी झाडे कोसळल्याने काही भागात वीजपुरवठा सुरळीत करता आला नाही. येळ्ळूर, अवचारहट्टी, यरमाळ यासह परिसर रात्रभर अंधारात होता. शुक्रवारी दुपारपासून खंडित झालेला वीजपुरवठा थेट शनिवारी दुपारीच परतल्याने मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्जिंगविना बंद झाली होती.