Karad News : आगाशिव डोंगरातील 50 झाडांची तोड ; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
वृक्षतोडीच्या प्रकरणामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
कराड : आगाशिव डोंगर परिसरात पर्यावरणप्रेमींनी कष्टाने लावलेली झाडे समाजकंटकांनी तोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. नगरपरिषद हद्दीतील आगाशिव डोंगरावर लावलेल्या तब्बल ५० पेक्षा जास्त झाडांची तोड झाल्याचे समोर आले असून या कृत्याबद्दल पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित समाजकंटकांविरोधात नगरपरिषद व वनविभागाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून त्यांची नावेही निवेदनाद्वारे प्रशासनास कळविण्यात येणार आहेत.
आगाशिव डोंगर परिसरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार दीर्घकाळापासून आहे. अनियमित तोडफोडीमुळे डोंगराचा मोठा भाग ओसाड झाल्याचे स्पष्ट दिसत होते. या ओसाडपणाला पुन्हा हिरवळ आणण्यासाठी आगाशिवनगर व मलकापूर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला. परिसरातील अनेक शाळांनी वृक्षलागवडीचे उपक्रम अनेक वर्षापासून राबवले आहेत.
आगाशिवनगर येथील पर्यावरणप्रेमी अजित सिताराम सांडगे व अजित सांडगे यांच्या पुढाकाराने डोंगरावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली होती. झाडांच्या संगोपनासाठी त्यांनी स्वखर्चाने पाण्याची सोय करून ठिबक सिंचन प्रणाली उभी केली आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींसह अनेक झाडे उत्तम वाढली व ओसाड डोंगर पुन्हा हिरवागार होत असल्याचे चित्र दिसू लागले.
या परिसरात १५० हून अधिक झाडे सांडगे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने लावून वाढवली आहेत. मात्र, काही समाजकंटकांनी यातील अनेक झाडे तोडून टाकली. पाळीव जनावरांना चारण्यासाठी किंवा जळणासाठी लाकूड मिळवण्यासाठी ही झाडे तोडली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक महिन्यांच्या कष्टांनंतर वाढवलेली झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वास्तविक, वृक्षतोड हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वनविभागानेही तपासात लक्ष घातले आहे. झाडे तोडणाऱ्यांवर संबंधित कलमानुसार कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत