महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगुंदी कॅनरा बँकेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांचे हाल

10:25 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी-महिला ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया : ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी : बँक प्रशासनाने प्रामाणिकपणे सेवा देण्याची कर्मचाऱ्यांना सूचना करण्याची मागणी 

Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

बेळगुंदी गावात कॅनरा बँकेची शाखा आहे. बेळगुंदी परिसरातील शेतकरी व महिलांची खाती या बँकेमध्ये आहेत. मात्र या बँकेत आलेल्या खातेधारकांना वेळेत पैसे मिळत नाहीत. तसेच या बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी तासन्तास बँकेत बसून राहावे लागत आहे. तर बऱ्याच वेळेला बँकेत पैसे नसल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागत आहे. त्यामुळे गावात बँक असूनही नागरिकांना पैसे काढण्यासाठी हाल होत आहेत. बेळगुंदी गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत बेळगुंदी ग्रामपंचायत, बिजगर्णा ग्रामपंचायत यांची खाती आहेत. तसेच भागातील शेतकरी व महिलासुद्धा खातेधारक आहेत. त्यामुळे या बँकेत येणाऱ्या ग्राहकांची रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे नागरिकांना एक-दोन हजार ऊपयांची रक्कम काढण्यासाठी अर्धा अर्धा दिवस बँकेत बसून राहावे लागत आहे. अशा तक्रारी या भागातील नागरिकांतून होऊ लागल्या आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना बँक कर्मचारी व बँकेमधून योग्य प्रकारची सेवा मिळत नाही. अशा तक्रारी या भागातील शेतकरी वर्ग करीत आहेत. बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर आदी गावातील असंख्य नागरिकांची खाती या बेळगुंदी गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत आहेत. या भागातील बहुतांशी लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. सध्या खरीप हंगामातील कामे जोमाने सुरू आहेत. मात्र कॅनरा बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अर्धा अर्धा दिवस बँकेत ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: वैतागून गेलेले आहेत.

सोमवार दि. 1 रोजी या कॅनरा बँकेच्या शाखेत केवळ दोनच कर्मचारी होते. तसेच सोमवारी आलेल्या ग्राहकांना पैसे देण्यात आले नाहीत. बँकेत पैसेच नाहीत असे सांगून ग्राहकांना परत पाठविण्यात आले, अशी माहिती सुभाष हदगल यांनी दिली आहे. या बँकेत आलेल्या ग्राहकांना पासबुक एंट्री करून देण्यात येत नाही. त्यामुळे आपल्या खात्यावर किती पैसे जमा आहेत, याचा अंदाजही ग्रामीण भागातील या नागरिकांना येत नाही. त्यामुळे बराच गोंधळ निर्माण होऊ लागलेला आहे. बँकेत आल्यानंतर पासबुक एंट्री करून घेण्यात येत नाही. तुम्ही मोबाईल वरती बॅलन्स चेक करून घ्या आणि नेटद्वारे प्रिंट घ्या, असे सांगण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना हे जमणार आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

वरिष्ठांनी बँकेची पाहणी करावी

बेळगुंदी कॅनरा बँक शाखेमधून वेळेवर पैसे मिळत नाहीत. पासबुक एंट्री करून देण्यात येत नाही. अशा या बँकेबद्दल अनेक तक्रारी नागरिकांनी बेळगुंदी ग्रामपंचायतमध्येही केलेल्या आहेत. वास्तविक ही कॅनरा बँकेची शाखा ग्रामीण भागात येते. त्यामुळे या भागातील सर्वच नागरिक सुशिक्षित असतात असे नाही. काही महिला रोजगारचे पैसे काढण्यासाठी जातात. काही वयोवृद्ध महिला व वयस्कर नागरिक पेन्शनचे पैसे काढण्यासाठी जातात. मात्र या नागरिकांना बँकेत पैसे मिळत नाहीत. योग्य प्रतिसाद मिळत नाही. अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. सध्या या बँकेत कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बेळगुंदी गावातील पॅनरा बँकेच्या शाखेची पाहणी करून त्वरित कर्मचारी वर्गाची नेमणूक करावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी आहे.

- हेमा हदगल (ग्रामपंचायत सदस्या, बेळगुंदी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article