नेतृत्व बदलाच्या चर्चेवर पडदा
सध्या मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही! : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची स्पष्टीकरण
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
राज्य राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री बदलाला अजून वेळ आहे. वेळ कधी येते ते पाहूया, असे सांगून त्यांनी सध्या तरी मुख्यमंत्री बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नेतृत्व बदलासंबंधी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर पडदा पडला आहे.
कलबुर्गी येथे गुरुवारी पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या राज्यात सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत, मी मुख्यमंत्री होण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. जर मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा उपस्थित झाला याबाबत वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी निर्णय घेतील. काही जण मी मुख्यमंत्री बनणे उत्तम, अशी प्रतिक्रिया देत आहेत. पण, सर्व निर्णय आमच्या नशिबाप्रमाणे नव्हे; तर पक्षाच्या विचारधारेनुसार घेतले जातात. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कुणी बनावे, याचा निर्णय बहुतांशी सोनिया गांधी घेतात. जेव्हा मुख्यमंत्री बदलाची वेळ येईल, तेव्हा सर्वजण एकत्र बसून त्यावर चर्चा करू. राज्य काँग्रेसमध्ये काही संभ्रम असल्यास, आम्ही ते दूर करण्यात येईल. कधी आणि काय करायचे हे हायकमांडला माहीत आहे, असे ते म्हणाले.
राज्य काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू, माजी खासदार डी. के. सुरेश यांनी दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घेतली. राज्यात पक्ष सत्तेवर आल्यानंतर अधिकार वाटपाबाबत झालेल्या कराराची अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय गटातील मंत्री सतीश जारकीहोळी आणि डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी दिल्ली पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन सिद्धरामय्या यांच्यासाठी लॉबिंग केली.
या सर्व घडामोडीदरम्यान राज्य काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी 15 मेपूर्वी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना खूशखबर मिळेल, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘मुख्यमंत्री बदलण्यास अजून वेळ आहे. ती वेळ कधी येते ते पाहूया, असे सांगून मे महिन्यात नेतृत्वबदल होणार असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांच्या या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे भविष्यात राज्य काँग्रेसमध्ये कोणत्या प्रकारच्या घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
खर्गे मुख्यमंत्री होण्यात काय हरकत आहे?
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंद होईल या आपल्या विधानाचे समर्थन केले. मल्लिकार्जुन खर्गे यांचे समकालीन नेते आर. गुंडूराव आणि वीरप्पा मोईली हे सर्व मुख्यमंत्री बनले. असे असतान खर्गे मुख्यमंत्री होण्यात काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. खर्गे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे खर्गे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंद होईल, असे आपण म्हटले होते, असे समर्थन त्यांनी केले.