Cultural Kolhapur : कोल्हापुरातील 'विशाळगडकर हाऊस' तुम्ही पाहिलंय का?
बहुतेकांची या वास्तूबाबतची समजूत म्हणजे ‘एखाद्या सरदाराचा वाडा’
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापुरातून कसबा बावड्याकडे जाताना महावीर कॉलेजच्या पुढे डाव्या हाताला नवीन राजवाडा दिसतो आणि रस्त्याच्या उजव्या बाजूलाही एक उंच दगडी वाडा त्याच्या दोन मनोऱ्यासह नजरेस पडतो. रस्त्यावरून जाणाऱ्या बहुतेक सर्वांच्या नजरा या वास्तूवर क्षणभर का होईना फिरतात आणि पाठोपाठ मनात येते की ही वास्तू कोणाची असेल, कोणी बांधली असेल, कशी बांधली असेल आणि या वास्तूचे अंतरंग कसे असेल? या वास्तूचे नाव विशाळगडकर हाऊस. मलकापूर बंगला म्हणूनही त्याची ओळख.
ज्येष्ठ आणि जाणकार लोकांनाच या वास्तूची नावाने ओळख आहे. अन्यथा ‘एखाद्या सरदाराचा वाडा’ अशीच बहुतेकांनी या वास्तूची समजूत करून घेतलेली आहे. ही वास्तू विशाळगडकर पंतप्रतिनिधींची. कोल्हापूरशी संबंधित 11 संस्थानिक आणि जहागीरदार. यापैकी विशाळगडकर, बावडेकर, कागलकर आणि इचलकरंजीकर हे मोठे संस्थानिक. विशाळगडकरांना पंतप्रतिनिधी हा किताब. बावडेकर पंत अमात्य किताबाने आणि कागलकर सर्जेराव वजारत या किताबाने सन्मानित.
इचलकरंजीकरांना घोरपडे किताब. तोरलगलकर यांना सेना खासगील, दत्तवाडकरांना अमीर उल उमराव किताब तर हिम्मतबहाद्दर कागलकर, सर्जेराव देशमुख सरलष्कर बहाद्दूर आणि पाटणकर हे जहागीरदार. विशाळगडकरांचे संस्थांनचे ठिकाण मलकापूर. 1844 साली पंतप्रतिनिधी मलकापूर येथे राहण्यास आले.
पंतप्रतिनिधी म्हणून कारकीर्दीची वेगवेगळ्या घटनांनी इतिहासात नोंद आहे. कृष्णराव भाऊसाहेब यांनी कोल्हापुरातील ही वास्तू बांधली. वास्तूचे बांधकाम अण्णासाहेब सरकार यांच्या कारकिर्दीत (मायनर) पूर्ण झाले. बावडा रस्त्यावर 1845 ते 1848 या कालावधीत ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींसाठी (पोलिटिकल सुपरिटेंड) निवासस्थाने बांधण्यात आली.
याच परिसरात 1874 ते 1877 या कालावधीत नवीन राजवाडा बांधण्यात आला. या परिसरात कागलकर, विशाळगडकर, इचलकरंजीकर, बावडेकर आणि अन्य संस्थानिक जहागीरदारांचे वाडे उभे राहिले. प्रत्येक संस्थानिक जहागीरदारांच्या वाड्याची बांधणी अर्थातच त्यांच्या पदाला कारकिर्दीला साजेशी. सहज नजरेत भरेल अशी ही वास्तू विशाळगडकरांची आहे.
मूळ आठ एकर जागेतील ही वास्तू म्हणजे ब्रिटिश व अन्य बांधकाम शैलीचा मिश्र नमुना मानली जाते. रस्त्यावरून सहज नजरेत भरते ती उंच मनोऱ्याची दगडी वास्तू. त्याला जोडूनच आतील बाजूस दुमजली इमारत आहे. उंच मनोऱ्याची वास्तू म्हणजे पंतप्रतिनिधींचे कार्यालय. बैठकी, चर्चा यांचे ठिकाण. या मुख्य वास्तूत साधारण 21 आणि जोड बंगल्यात 20 अशा एकूण 41 खोल्या आहेत. याशिवाय कारभारी, गाडीवान व इतर कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बाजूला आहेत.
वास्तूच्या दर्शनी भागात दोन मनोरे. त्याखाली सज्जा आणि सज्जा खाली कमान आहे. समोरच्या प्रांगणात कारंजा आहे. वास्तूचा परिसर उत्तरेकडे इचलकरंजीकर घोरपड्यांच्या वाड्यापर्यंत म्हणजे आत्ताचे महावीर महाविद्यालय, दक्षिणेकडे मुधोळ हाऊस म्हणजे सेंट झेवियर हायस्कूलपर्यंत पसरलेला होता.
या मुख्य वास्तूला मागच्या बाजूला चौक आहे. हा चौक पूर्ण वास्तूला नैसर्गिक प्रकाश आणि मोकळी हवा पुरवतो. हा चौक या मोठ्या वास्तुतही छोटेखानी घराचा आनंद देऊन जातो. वास्तूच्या खिडक्या, दारांची रचना समोरासमोर आहे. त्यामुळे हवा नेहमी खेळती राहते. खिडक्यांना चक्क लाकडी व्हेंटिलेटर आहेत. जोडबंगल्यात स्वयंपाकघर, माजघर, बाळंतिणीची खास अंधारी दमट खोली.
लोणच्याच्या बरण्यासाठी खास स्वतंत्र खोली, लोणचं घालताना स्वच्छता, सोवळंओवळं पाळायची अजूनही काही घरात पद्धत आहे. नेमकी त्याच धर्तीवर विशाळगडकर बंगल्यात खास लोणच्याच्या बरण्यांसाठी एक खोली आहे. वास्तूच्या मागे जुनी विहीर आहे. असे सांगतात की, या विहिरीचे पाणी पवनचक्कीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर चढवले जायचे. एवढ्या मोठ्या वास्तूची सांडपाणी निर्गत पद्धतीही दगडी पाटाची आहे.
या वास्तूवर पाणी किंवा सांडपाणी वाहूनयेणारा एकही नळ दिसत नाही. सारी रचना भिंतीच्या आतच केलेली आहे. या वास्तूचे बांधकाम झाल्यापासून कृष्णाजी उर्फ आबासाहेब पंतप्रतिनिधी, त्यांचे चिरंजीव भवानराव उर्फ आबाजीराव पंतप्रतिनिधी, त्र्यंबकराव उर्फ अप्पासाहेब, त्यांचे दोन चिरंजीव कृष्णराव उर्फ राजेसाहेब, जगजीवनराव उर्फ कुमारसाहेब यांचे वास्तव्य राहिले.
आता कृष्णरावांचे चिरंजीव आदित्यराव उर्फ बाबासाहेब आणि क्षितीजाराजे उदयराज पंतप्रतिनिधी (घण) यांचे वास्तव्य असते. पंतप्रतिनिधी घराण्यातील आदित्यराज, क्षितिजा आणि क्षितिजा यांचे पती उदयराज हे आर्किटेक्ट आहेत. त्यांनी विशाळगडकर हाऊसचे जुनेपण राखून छान डागडुजी केली आहे.