कच्च्या तेलाच्या किमती 40 डॉलरखाली येणार
गोल्डमॅन सॅचचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोल्डमॅन सॅचने नव्याने अंदाज बांधला असून 2026 च्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती 40 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरणार असल्याचे म्हटले आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गोल्डमॅन सॅचने म्हटले आहे. भारतासाठी ही बातमी दिलासादायी असू शकते. पण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही खरेतर बॅड न्यूजच असून धोक्याची घंटाच मानली जात आहे. गोल्डमॅन सॅच समूहाने जगभरातील गुंतवणूकदारांना सावध केले आहे. जागतिक परिस्थिती खूपच बिघडली तर ब्रेंट व्रुड तेलाच्या किमती 40 डॉलर प्रति बॅरलपर्यंत नीचांकी घसरु शकतात.
तरच किमती खाली येतील
गोल्डमॅन सॅचने पुढे म्हटले आहे की, अगदी असे होईलच म्हणून निश्चित सांगता येत नाही. पण परिस्थिती अत्यंत म्हणजे अत्यंत खराब झाली तरच किमती वर सुचवल्याप्रमाणे कमी होऊ शकतात. अर्थात तशी शक्यता कमीच आहे, असाही खुलासा गोल्डमॅन सॅचने केला आहे. ट्रम्प यांनी व्यापार युद्धाला धार चढवल्याने जागतिक मंदीची चिन्हे आहेत. चीनसह इतर देशांनीही अमेरिकेला टक्कर देण्याची योजना बनवायला सुरुवात केली आहे. याने परस्पर देशांतर्गत व्यापारावर परिणाम होणार आहेत.
इतर बँकांचे काय म्हणणे आहे...
मॉर्गन स्टॅनले आणि सोसायटी जनरलसारख्या मोठ्या बँकांनी तेलाच्या किमती घटण्याचा अंदाज वर्तवला आहे. या बँकाही आता कच्च्या तेलाच्या किमती किती खाली जाऊ शकतात याचा अंदाज बांधत आहेत. मंगळवारी ब्रेंट व्रुडची किमत 4 वर्षात सर्वात नीचांकी 65 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.
ओपेककडून उत्पादनात वाढ
दुसरीकडे ओपेकमधील देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ केलेली आहे. सुरुवातीला या देशांनी उत्पादनात घट केली होती. पण आता तेलाची मागणी घटते आहे आणि पुरवठाही वाढतो आहे. म्हणजेच अशा स्थितीत किमती कमी करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
तेलाच्या किमती घटल्यास फायदा कोणाला...
विदेशातून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारतासह सऊदी अरब हा देश आहे. या देशातील पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात आणि वाहनधारकांना याचा दिलासा मिळू शकतो. यायोगे महागाईचा स्तरही कमी होताना दिसणार आहे. ओपेक देशांच्या उत्पन्नात घट होऊ शकते. तसेच तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.
भारतावर काय परिणाम
भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयात करणारा देश मानला जातो. कच्चे तेल स्वस्त झाल्यास भारताला मोठा फायदा होऊ शकतो. कच्चे तेल घसरले तर पेट्रोल, डिझेल स्वस्त होईल. महागाई दरावरचा दबाव कमी होऊ शकतो. राजकोषीय तूट सांभाळली जाऊ शकते. तसेच रुपया मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करु शकतो, असे म्हटले जात आहे.