हुलकावणी दिल्याच्या रागातून कारचालकासह महिलांना मारहाण
चिंदर येथील दुचाकीस्वारावर आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा
आचरा | प्रतिनिधी
हुलकवणी दिल्याच्या रागातून दुचाकीस्वार व कारचालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादात दुचाकीस्वाराने कारचालक आणि कारमधील कारचालकाच्या नातेवाईक असलेल्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. या मारहाणीत त्या महिला जखमी झाल्या होत्या. जखमी महिलांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करत सोडण्यात आले. कारचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आचरा पोलिसांनी चिंदर बाजार येथील जेरी फॉरेन्स फर्नांडीस (वय 39 ) या दुचाकीस्वरावर भारतीय न्याय संहिता कलम 115, 324(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणप्रकारणी कारचालक चैतन्य वसंत सावंत रा कोलझर, दोडामार्ग यांनी आचरा ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे की मी व माझे नातेवाईक 3 महिला हे आचरा कणकवली मार्गावर वेंगेनर कारने प्रवास करत असताना चिंदर बाजार दरम्यान एक दुचाकीस्वार हा आपल्या कार समोरून दुचाकीने जाण्यास गेला लागलीच तो पुन्हा दुचाकी वळवत कारच्या बाजूने गाडी चालवत कार थांबवण्याचा इशारा करू लागला आणि दुचाकी कारला घासून चालू लागला आपण कार थांबवली असता त्याने कारच्या खिडकीतून हात घालत माझी कॉलर पकडत मला हूल देतोस म्हणजे काय असे म्हणत शिव्या देत मला कार बाहेर खेचले व हाताच्या ठोश्याने व लाथांनी मारू लागला. माझ्या गाडीतील नातेवाईक महिला यावेळी मला सोडवण्यासाठी आल्या असता लाथाबुक्क्यानी त्यांनाही मारहाण करत जखमी केले. असे आपल्या फिर्यादित म्हटले आहे.घटना घडल्याचे समजल्यानंतर आचरा पोलिस तुकाराम पडवळ, मिलिंद परब, विशाल वैजलं, मनोज पुजारे यांनी धाव घेतली. त्या कारचालकासह जखमी महिलांना आचरा पोलिसांनी आचरा आरोग्यकेंद्रात हलवले होते.