For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती

06:32 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती
Advertisement

आता एकूण जिल्ह्यांची संख्या झाली सात :  विकासावर भर देण्याच्या दृष्टीने निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवार, 26 ऑगस्ट रोजी लडाख केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली. नव्या जिह्यांची नावे झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी आहेत. नवीन जिल्ह्यांची घोषणा होण्यापूर्वी लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. आता त्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची माहिती ‘एक्स’वर दिली. लडाखच्या विकासासाठी केंद्रशासित प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन मजबूत करून लोकांसाठी संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरचे पूर्वीचे राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. कलम-370 रद्द करण्यात आल्यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला होता.

तीन महिन्यात अहवाल मागवला

गृह मंत्रालयाने लडाख प्रशासनाला जिल्हा मुख्यालय, सीमा, रचना, पदांची निर्मिती यासारख्या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीशी संबंधित सर्व पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास आणि तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाख या अहवालाच्या आधारे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवेल.

लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. यापूर्वी लडाखमध्ये लेह आणि कारगिल असे दोन जिल्हे होते. हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. दुर्गम व अवघड असल्याने जिल्हा प्रशासनाला जमिनीपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या. या जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर आता केंद्र सरकार आणि लडाख प्रशासन लोकांपर्यंत सहज पोहोचू शकणार आहे.

लोकांना सेवा आणि संधी मिळतील : पंतप्रधान

पंतप्रधान मोदींनी नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त करताना हे चांगल्या प्रशासनाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे म्हटले आहे. ‘लडाखमध्ये 5 नवीन जिह्यांची निर्मिती हे उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल आहे. आता झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांगवर अधिक लक्ष दिले जाईल. साहजिकच सेवा आणि संधी लोकांच्या जवळ येतील. तिथल्या लोकांचे अभिनंदन’, असे ट्विट मोदींनी ‘एक्स’वर केले आहे.

अनेक दिवसांपासून मागणी

लडाखचे माजी खासदार आणि भाजप नेते जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी जिल्हा निर्मितीबाबत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी माझ्या कार्यकाळात लोकसभेतही हा मुद्दा मांडला होता, असे ते म्हणाले.

पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी

लडाखचे लोक पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीची मागणी करत आहेत. पूर्ण राज्य नसले तरी विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असावा असे त्यांचे म्हणणे आहे. 4 मार्च रोजी, गृह मंत्रालयाची लडाखमधील दोन प्रमुख संघटना, लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि विशेष दर्जा कायम ठेवण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.